आदिवासी विद्यार्थी संमेलनात मंत्री गोविंद गावडेंची घोषणा
प्रतिनिधी/ फोंडा
विद्यार्थ्यांनी परिस्थितीसमोर शरण न जाता स्वतःवर ठाम विश्वास ठेवून निश्चित ध्येयाकडे मार्गक्रमण केले पाहिजे. जगात अशक्य असे काहीच नाही. आवडीच्या क्षेत्रात समर्पितवृत्तीने स्वतःला झोकून दिल्यास स्वप्नांची पूर्तता निश्चितच होईल. पैशांच्या अडचणीमुळे आदिवासी समाजातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची पूर्ण जबाबदारी आदिवासी कल्याण खात्याने उचललेली आहे, अशी घोषणा आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
तिसऱया आदिवासी विद्यार्थी संमेलनाच्या उद्घाटन सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आदिवासी कल्याण खाते व उटा संघटनेच्या सहकार्याने फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये शनिवारी हे संमेलन आयोजित करण्यात आले. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री व फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, प्रमुख वक्त्या म्हणून ऑलिम्पिक पदक विजेत्या वेटलिफ्टर पद्मश्री करनाम मल्लेश्वरी त्यागी, महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप, अनुसूचित जाती जमात आयोगाचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, व्यस्थापकीय संचालक अरविंद खुटकर, शिक्षण खात्याचे उपसंचालक डॉ. उदय गावकर, आदिवासी कल्याण खात्याच्या संचालिका त्रिवेणी वेळीप व अन्य मान्यवर उपस्थित होते.
समाजातील मागास घटकांना समान पातळीवर आणण्यासाठी सर्वांना शिक्षणाची योग्य संधी मिळाली पाहिजे. कुळ मुंडकारांचे सर्व खटले निकाली लागतील तेव्हाच भूमिपुत्र खऱया अर्थाने अन्यायमुक्त होतील, असे आमदार रवी नाईक म्हणाले. आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रकाश वेळीप म्हणाले, आरक्षण हा घटनादत्त अधिकार असला तरी ते तात्पुरता आहे. समाजातील बुद्धिमान विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या क्षमतेने पुढे आले पाहिजे. आदिवासींच्या अजून काही मागण्या प्रलंबित असल्याचे सांगून गोवा विधानसभेत आदिवासींसाठी मतदारसंघ आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारपुढे मांडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींना आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात नितीन बाबलो शिवडेकर, कृषी क्षेत्रात धिल्लन वेळीप, कला क्षेत्रात शिवा बाळू गावडे व क्रीडा क्षेत्रात भारती गावकर यांना मान्यवरांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. उदय गावकर यांनी लिहिलेल्या ‘उटा संघर्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्वागत त्रिवेणी वेळीप यांनी केले.
इरादे बुलंद असल्यास, ध्येय निश्चित गाठाल ः मल्लेश्वरी
उद्घाटन सोहळय़ानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करनाम मल्लेश्वरी म्हणाल्या कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आधी पराभूत मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे. जीवनात कधीही हार न मानता अपयश आल्यास त्यातील त्रूटी शोधून पुढे जाण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्रत्येकांमध्ये काहीना काही गुण असतात. आपले इरादे बुलंद असल्यास, आपण निश्चित ध्येयाकडे उच्च झेप घेऊ शकतो. दिल्ली येथील क्रीडा विद्यापीठात सहावी ते नववीपर्यंत शिकणाऱया देशभरातील दोनशे विद्यार्थ्यांची विविध क्रीडा प्रकारांसाठी निवड केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी विविध राज्यातून क्रीडा टेलंट शोधण्याचे काम लवकरच सुरु होईल. गोव्यातूनही असे गुणवंत खेळाडू शोधले जातील. ऍथलेटिक, कुस्ती, वेटलिफ्टिंग, तिरंदाजी, शुटींग, बॉक्सिंग, जलतरण, टेबलटेनिस, बॅडमिंटन अशा दहा क्रीडा प्रकारांमध्ये ही निवड होणार आहे. या क्रीडापटूंना दिल्लीत शिक्षणाबरोबरच क्रीडा प्रशिक्षणाची संधी मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
नकारात्मक विचार व नकारात्मक लोकांपासून दूर राहा ः डॉ. राजेंद्र भारूड
डॉ. राजेंद्र भारूड यांनी भिल्ल समाजातील एक गरीब कुटुंबापासून आयएएसपर्यंतची आपली यशोगाथा विद्यार्थ्यांना सांगीतली. गरीबीचा बाऊ न करता संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असे सांगून आरक्षणाविषयी बोलताना प्रत्येकाने त्यावर अवलंबून राहायलाच हवे, असे नाही. स्वतःमधील बौद्धिक क्षमता सिद्ध करण्यासाठी आरक्षणाची गरज नाही. जीवनात जे काही करायचे ते सर्वोकृष्ट करा. सतत तुमच्यात सुधारण घडवत राहा, त्यासाठी स्वतःविषयी आत्मविश्वास बाळगा. जीवनात सर्व काही सुरक्षित मिळाल्यास आपण यशस्वी होणार नाही. पालकांनी आपल्या मुलांना संघर्ष व आव्हाने पेलण्यास मोकळीक द्यावी. खवळलेल्या समुद्रातच खलाशाची खरी कसोटी लागते. जीवनात सोपा मार्ग शोधल्याने उच्च शिखरावर पोचता येत नाही. त्यासाठी नकारात्मक विचार व नकारात्मक लोकांपासून दूर राहा, असे ते म्हणाले.