प्रतिनिधी / औंध
खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील नेर धरणातील पाणी येरळा नदीत सोडून बंधारे भरुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे पैसे भरले मात्र सोडलेले पाणी भुरकवडी, कुरोली भागात पोहचण्यापूर्वीच बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना कुणाच्या दबावाखाली पाणी बंद करण्यात आले असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. कृष्णा सिंचन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाणी द्यावे अशी मागणी होत आहे.
गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने ब्रिटिशकालीन नेर धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मुबलक पाणीसाठा असल्याने नेर मुख्य , डावा आणि उजव्या कालव्याने रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाने खूप प्रयत्न केले होते. शेतकऱ्यांचे अपेक्षित पाणी मागणी अर्ज आले नव्हते तरीही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चिकाटी न सोडता शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करुन दिले होते.
एप्रिल आणि मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई ध्यानात घेऊन खटाव, कुरोली, भुरकवडी परिसरातील शेतकऱ्यांनी पैसे भरुन येरळा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. पैसे भरतानाही बरेच राजकारण झाले होते. परंतु नेहमी पैसे भरणाऱ्या शेतकऱ्यांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करत प्रामाणिकपणे पैसे भरल्याने येरळा नदीत पाणी सोडण्यात आले. नदीवरील बंधारे भरण्याचे आश्वासन देण्यात आले होते. खटाव, भुरकवडी, कुरोली परिसरात पाणी पोहचले मात्र बंधारे भरण्यापूर्वीच अचानक पाणी बंद करण्यात आले. धरणात पुरेसा पाणीसाठा नाही, धरण परिसरातील शेतकऱ्यांसाठी पाणी ठेवावे लागणार असल्याची कारणे पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. राजकीय दबावतंत्राचाही याप्रकरणी वापर करण्यात आला.
शेवटच्या टोकापर्यंत पाणी कधीच पोहचत नाही
पाणी बंद करण्यात आल्याने पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना काही रक्कम परत करण्यात आली. शेतकऱ्यांनी पैसे नको पाणी द्या अशी मागणी करुनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सहाशे हेक्टर लाभक्षेत्र असणाऱ्या नेरचे पाणी शेवटच्या टोकावरील अनेक गावांना कधीच मिळत नाही. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नाही अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.