आईचाही आत्महत्येचा प्रयत्न; पतीच्या विरहातून कृत्य
प्रतिनिधी/ कराड
सहा महिन्यांपूर्वी पतीचे अपघाती निधन झाल्याच्या दुःखातून न सावरलेल्या आईने पोटच्या दोन चिमुकल्या मुलांचा गळा दाबून खून केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली. कराडच्या रूक्मिणीनगर परिसरात घडलेल्या या घटनेनंतर आईने विषारी औषध प्राशन करून स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या दुहेरी खुनाच्या घटनेत अवघ्या सहा आणि आठ वर्षाच्या चिमुकल्यांचा बळी गेल्याने कराड परिसर हादरला. मंगळवारनंतर बुधवारी दुसऱयाच दिवशी दुहेरी खुनाची पुनरावृत्ती झाल्याने खळबळ उडाली.
हर्ष सुजित आवटे (वय 8) आणि आदर्श सुजित आवटे (वय 6) अशी हकनाक बळी गेलेल्या मुलांची नावे आहेत. तर अनुष्का सुजित आवटे असे पोटच्या मुलांचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आईचे नाव आहे.
दरम्यान, घटनास्थळी अनुष्का यांनी पोलीस अधिकाऱयांच्या नावे लिहलेली चिठ्ठी आढळली असून पतीचा विरह सहन होत नसल्याने आम्ही आमचे जीवन संपत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड येथील रुक्मिणीनगर भागात सुजीत आवटे हे पत्नी, मुलांसह राहात होते. सुजीत आवटे यांच्या निधनानंतरही तीन मजली घराच्या तिसऱया मजल्यावर अनुष्का आवटे या आपल्या दोन मुलांसह रहात होत्या. तर मधल्या मजल्यावरती अनुष्का यांचे दीर इतर कुटुंबीयांसह राहत आहेत.
पती सुजीत यांच्या अपघाती मृत्यूने धक्का
सहा महिन्यापूर्वी अनुष्का आवटे यांचे पती सुजित यांचा एका अपघातात मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूचा मानसिक धक्का अनुष्का आवटे यांना बसला होता. मुलांना वडिलांचे प्रेम मिळत नसल्याची खंत त्यांना नेहमी वाटायची. यातूनच त्यांचे नैराश्य वाढत गेले असावे. त्यांनी पोलिस अधिकाऱयांच्या नावे चिठ्ठी लिहून स्वतःच्या लहान दोन हर्ष व आदर्श या मुलांसह स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असावा.
मुलांना संपवल्यानंतर स्वतः हाताची नस कापली
पती विरहाच्या नैराश्यातून अनुष्का यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील म्हणाले, त्यांनी प्रथम हर्ष व आदर्श या दोघांचा गळा आवऴून खून केला असावा. दोन्ही भावंडे अंथरूणावर निपचित अवस्थेत पडली होती. या घटनेचा उल्लेख अनुष्का यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये असल्याचेही पाटील यांनी सांगितले. मुलांच्या मृत्यूनंतर अनुष्का यांनी स्वतः विषारी औषध घेत हाताची नस कापून घेतली. दरम्यान, बुधवारी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास आज्जी मुले खाली खेळायला का आली नाहीत म्हणून वरच्या मजल्यावर गेल्या. त्यांनी दरवाजा उघडून मुलांना हाका मारल्या मात्र आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्या बेड रूममध्ये गेल्या. बेडवर निपचीत पडलेली मुले पाहून त्यांनी पुन्हा हाका मारत उठवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या बाजूलाच अनुष्काही पडल्या होत्या.
नातवंडांना हाका मारणाऱया आज्जींना धक्का
आजीने मुलांच्या अंगावरील पांघरुण बाजूला करून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु मुले जागची हलली नाहीत. त्यामुळे आजीला संशय आल्याने त्या मोठमोठय़ाने ओरडत खोलीतून बाहेर आल्या. आज्जींच्या ओरडण्याच्या आवाजाने इतर नातेवाईकांसह शेजारी अनुष्का यांच्या फ्लॅटकडे धावले. घरातील धक्कादायक दृश्य पाहून सर्वच सुन्न झाले. नातेवाईकांसह शेजारील नागरिकांनी मुलांना तत्काळ जवळच्याच श्री हॉस्पीटलमधे पळवले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तोपर्यंत जखमी अवस्थेतील अनुष्का यांनाही रुग्णालयात हलवले. खासगी रुग्णालयात अनुष्का यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र हाताची नस कापली गेल्याने व विषारी औषध पिल्याने त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेमुळे रूक्मिणीनगर परिसर हादरून गेला. कॉलनीत सन्नाटा पसरला होता. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरुटे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
चौकट
पतीच नाहीत तर त्यांच्या विम्याचे पैसे काय करू?
पोलीस म्हणाले, मुलांचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अनुष्का यांनी लिहलेल्या चिठ्ठीत पती सुजीत यांच्या जाण्याने एकटे एकटे वाटत असून मुलांना वडिलांचे प्रेम मिळत नसल्याचा उल्लेख केला आहे. पती सुजीत यांच्या अपघातानंतर विम्याचे पैसे मिळवण्याचे प्रयत्न वकिलांनी थांबवावेत. पतीच राहिले नाहीत तर त्यांच्या विम्याच्या पैशाचे आम्ही काय करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही आता जीवन संपवत असून आमच्या माघारी घरातील साहित्याचे गोरगरिबांना वाटप करावे, असा उल्लेखही चिठ्ठीत आहे. दरम्यान या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील करत असून त्यांनी रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या अनुष्का यांच्या तब्बेतीची चौकशी केली.