राजद खासदाराचा मोठा दावा
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभेचे दोन मतदारसंघ कुशेश्वरस्थान आणि तारापूरमधील पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. संजद, राजदसमवेत प्रमुख राजकीय पक्ष सातत्याने निवडणूक प्रचार करत आहेत. 30 ऑक्टोबर रोजी होणाऱया पोटनिवडणुकीचा 2 नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यावर बिहारमध्ये रालोआचे सरकार कोसळणार असल्याचा दावा राजद खासदार मनोज झा यांनी केला आहे.
राजद यावेळी मुंगेरमधील तारापूर आणि दरभंगा जिल्हय़ातील कुशेश्वरस्थान हे दोन्ही मतदारसंघ जिंकणार आहे. राजदच्या बाजूने निकाल लागताच नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल असे झा म्हणाले.
सत्तारुढ रालोआ आणि विरोधी पक्षांच्या आघाडींमधील संख्याबळात फारसा मोठा फरक नाही. काहीही घडू शकते असे विधान त्यांनी केले आहे. बिहार काँग्रेस प्रभारी भक्त चरण दास हे एक ड्रॉइंग रुम राजकीय नेते आहेत, त्यांना बिहारमधील वस्तुस्थिती माहित नाही. राजदवर टिप्पणी करण्यापूर्वी भक्त चरण दास यांनी स्वतःच्या आमदारांकडून फीडबॅक घ्यायला हवा असे झा यांनी म्हटले. बिहारमधील महाआघाडी तोडण्यासाठी राजद जबाबदार असल्याचे भक्त चरण दास यांनी म्हटले होते. बिहार पोटनिवडणुकीपूर्वी राजद नेतृत्वाने काँग्रेस पक्ष आणि नेत्यांवर केलेली टिप्पणी अस्वीकारार्ह आहे. बिहारमध्ये महाआघाडीचे आता कुठलेच भविष्य नसल्याचे दास यांनी नमूद केले होते.