प्रतिनिधी/ बेंगळूर
सिरा आणि राजराजेश्वरीनगर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक प्रचाराची रविवारी सायंकाळी 6 वाजता सांगता झाली. मतदारांचे मन परिवर्तन करण्यासाठी भाजप, काँग्रेस व निजद या प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न पणाला लावले आहेत. या दोन्ही मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार दि. 3 रोजी मतदान होणार असून 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, एच. डी. कुमारस्वामी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, अश्वथनारायण, भाजप उपाध्यक्ष बी. वाय. राघवेंद्र यांच्यासह तिन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी मतयाचना केली आहे. अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत रॅली काढली आहे.
एच. डी. देवेगौडा यांनी सिरा विधानसभा मतदारसंघात रोड-शोद्वारे मतयाचना केली आहे. गत विधानसभा निवडणुकीत सिरा मतदारसंघात निजद उमेदवार बी. सत्यनारायण यांचा विजय झाला होता. त्यांच्या अकाली निधनामुळे याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. सत्यनारायण यांची पत्नी अम्माजम्मा यांना निजदतर्फे तिकीट देण्यात आले असून त्यांना जनतेने विजयी केल्यास पुढील पाच वर्षे सिरा मतदारसंघ दत्तक घेऊन संपूर्ण विकास करण्यात येईल, असा भरवसाही देवेगौडा यांनी दिला आहे.
काँग्रेसर्फे टी. बी. जयचंद्र यांना उमदेवारी दिली असून माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, माजी आमदार के. एन. राजण्णा यांनी जोरदार प्रचार केला आहे. भाजप उमेदवार राजेशगौडा यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ, भाजप उपाध्यक्ष बी. वाय. राघवेंद्र यांच्यासह इतर नेत्यांनी मतयाचना केली आहे. तर राजराजेश्वरीनगर मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस उमेदवार कुसूमा यांच्या विजयासाठी जोरदार प्रचार केला असून मत्तीकेरे, यशवंतपूर आदी भागात जाऊन काँग्रेस उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतयाचना केली आहे.
उपमुख्यमंत्री अश्वथनारायण, मंत्री आर. अशोक, एस. टी. सोमशेखर यांच्यासह इतर नेत्यांनी भाजप उमेदवार मुनिरत्न यांच्या विजयासाठी प्रचार केला आहे. तर निजद उमेदवार कृष्णमूर्ती यांच्या विजयासाठी पक्षातील प्रमुख नेत्यांनी मतयाचना केली आहे. त्यानुसार पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रविवारी सायंकाळी 6 वाजता सांगता झाली. तर प्रचारासाठी बाहेरून आलेल्यांना मतदारसंघातून बाहेर पाठविण्यात आले आहे. तसेच उमेदवाराला सोमवार सायंकाळपर्यंत घरोघरी जाऊन मतयाचना करण्याची मुभा देण्यात आली आहे.