मुंबई/प्रतिनिधी
देशावर कोरोनाच संकट असूनही पाच राज्यांच्या निवडणुकांकडे साऱ्या देशाचं लक्ष लागून राहील आहे. देशातील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडु, केरळ आणि पुदुच्चेरीत मतमोजणी सुरु झाली आहे. या व्यतिरिक्त काही राज्यांमध्ये पोटनिवडणूका झाल्या होत्या. त्या पोटनिवडणूक निकालाची मतमोजणी सुरु झाली आहे. यात २ लोकसभा आणि १४ विधानसभा जागांचा समावेश आहे.
कर्नाटकातील बेळगाव लोकसभेची जागा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती. त्यानंतर आंध्र प्रदेशातील तिरूपती लोकसभेची जागेवर पोटनिवडणूक पार पडली. वायएसआर काँग्रेस पार्टीचे खासदार बी. दुर्गाप्रसाद यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. दोन्ही जागेवर १७ एप्रिलला मतदान झालं होतं. आता पोटनिवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु झाली आहे.
या व्यतिरिक्त ११ राज्यातील १४ विधानसभा जागांवरही पोटनिवडणूक पार पडली होती. त्यासाठी आज मतमोजणी होत आहे. राजस्थानच्या सहारा, सुझानगड आणि राजसमंद, कर्नाटकच्या बसवकल्याण आणि मस्की, झारखंडच्या मधुपूर, मध्य प्रदेशच्या दमोह, महाराष्ट्रातील पंढरपूर, मिझोरमच्या सरछिप, गुजरातच्या मोरवा हदफ, नागलँडच्या नोकसेन, ओडिशाच्या पिपिली, तेलंगाणातील नागार्जुन आणि उत्तराखंडच्या सल्ट विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक पार पडली होती. या ठिकाणी १७ एप्रिलला मतदान झालं होतं.