नांदगाव येथील घटना : ग्रामपंचायतीकडून अखेर कोंबडय़ांची विल्हेवाट
प्रतिनिधी / कणकवली:
महामार्गावरील नांदगाव-असलदे तावडेवाडी पियाळी नदी येथे वाहत्या पाण्यात अज्ञाताने पोती भरून मृत ब्रॉयलर कोंबडय़ा टाकल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. मृतावस्थेत असलेल्या या कोंबडय़ांची पोती असलदे ग्रा.पं. कर्मचाऱयांच्या मदतीने बाहेर काढून खड्डा मारून पुरत त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. या नदी शेजारीच नांदगाव व असलदे ग्रा.पं.च्या नळयोजनेच्या विहिरी असल्याने या विहिरीचे पाणी दूषित होऊ नये, यासाठी टीसीएल टाकून पाणी शुद्धिकरण करण्यात आले.
या ठिकाणी पोत्यात भरून कोंबडय़ा टाकण्यात आल्याची माहिती मिळताच असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, नांदगाव ग्रामविस्तार अधिकारी पुरुषोत्तम हरमळकर, असलदे ग्रामसेवक आर. डी. सावंत, ग्रा.पं. सदस्य मजीद बटवाले, अरुण बापर्डेकर, भाई मोरजकर, नांदगाव शाखाप्रमुख राजा म्हसकर, श्रीकांत नार्वेकर, असलदे ग्रा.पं. कर्मचारी प्रकाश वाळके, सत्यवान घाडी, मधुसुदन परब तसेच आरोग्य कर्मचारी आदींनी घटनास्थळी येत माहिती घेतली. पंढरी वायंगणकर यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलीस हवालदार राजकुमार खाडे व कासार्डे पोलीस दूरक्षेत्राचे रमेश नारनवर यांनीही येत घटनास्थळाची माहिती घेतली.
अज्ञाताने पोती भरून ब्रॉयलर कोंबडय़ा टाकल्याचे काहीजणांच्या निदर्शनास येईपर्यंत काही कोंबडय़ा वाहून गेल्या, तर काही पोती खडकात अडकून पडली होती. ग्रा.पं. सदस्य दिनेश तावडे यांचे मंगळवारी ही बाब निदर्शनास आली असता, त्यांनी लागलीच सरपंच पंढरी वायंगणकर यांना माहिती दिली. याच नदीलगत नांदगाव व असलदे ग्रा.पं.च्या नळयोजनेच्या विहिरी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक नसल्याने अज्ञाताने त्या पोत्यात भरून टाकल्या असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. संबंधिताचा पोलिसांनी कसून शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.