प्रतिनिधी/सांगली
गृहमंत्री झाल्यावर रक्तदाब आणि मधुमेह होतो, हे अत्यंत खरे आहे. कारण इतका ताण या पदावरील मंत्र्याला असतो, त्याचा मी अनुभव घेतला आहे. गृहमंत्र्याला इतका ताण तर पोलिसाला किती ताण असेल, याचा विचार सर्वांनी करावा. यापुढील काळात पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, विक्रम सावंत, अनिल बाबर, श्रीमती सुमनताई पाटील, अरूण लाड, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया उपस्थित होते.
घरांचाही प्रश्न सोडवणार
पालकमंत्री म्हणाले, सांगली शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, जिल्हा न्यायालयाची इमारत चांगल्या, अद्ययावर झाल्या आहेत. त्या तोडीस तोड पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमारत होईल. या इमारतीमुळे सांगली शहराची शोभा वाढेल. याशिवाय जिल्हÎातील पोलिसांच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी आमच्याकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. 216 नवीन फ्लॅट बांधण्यासाठी लवकरच निधी मंजूर करण्यात येत आहे. घरे दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 1 कोटी 90 लाख रूपये देण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.
नवीन 35 बोलेरो, 61 दुचाकी
जिल्हा पोलीस दलात यापूर्वी 23 स्कॉपिओ देण्यात आल्या आहेत. आता पुन्हा नव्याने 35 बोलेरो गाडÎा आणि 61 दुचाकी देण्यात येणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. या गाडÎा खरेदीसाठी मंजुरी दिली असून लवकरच त्या पोलीस दलात दाखल होतील. अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी ही वाहने दाखल झाल्याने पोलीस दलाची सक्षमता वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
112 मुळे पोलीस तत्काळ हजर
अडचणीतील व्यक्तीने 112 क्रमांक डायल केला की तत्काळ पोलीस त्या अडचणीत असणाऱया व्यक्तीजवळ पोहोचणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा क्रमांक तयार करण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलाची सक्षमताही नागरिकांच्या लक्षात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रीन बिल्डिंग बनावी
मंत्री विश्वजीत कदम म्हणाले, ही इमारत अत्यंत चांगली होत आहे. पण, या इमारतीमध्ये जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करण्यात यावा. इमारतीच्या बाजूला असणारे पार्किंग अंडर गाऊंड करावे, त्यामुळे बाजूची जागा अन्य वापरात येईल. जिल्हÎातील सुपुत्रांनी जे शौर्य गाजविले आहे, त्याच्या स्मृती जतन करणारे एक दालन ठेवण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, राज्यातील पोलीस दल सक्षम करण्यासाठी मोठÎा प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला आहे. एक हजार व्यक्तीमागे एक पोलीस आहे हे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस दलाची भरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या घर बांधकामासाठी 800 कोटीच्या निधीची तरतुद करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वागत पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केले तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी मानले.
गृहमंत्री व वरिष्ठ अधिकाऱयांची अनुपस्थिती
या भूमिपूजन कार्यक्रमासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. पण, त्यांची अनुपस्थिती होती तसेच गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजयकाका पाटील, धैर्यशील माने, पोलीस महासंचालक संजय पांडे, अप्पर मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक पोलीस गृहनिर्माण महामंडळ विवेक फणसळकर यांची अनुपस्थिती होती.
काम छडी घेवून करून घ्या ः मंत्री जयंत पाटील
या इमारतीचे ठेकेदार कोण आहेत, हे मला माहिती नाही. पण, ही इमारत चांगली आणि खणखणीत होण्यासाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी छडी घेवून ठेकेदारांकडून काम करून घ्यावे, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच या कामावर लक्ष ठेवण्यासाठी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि आमदार सुधीर गाडगीळ यांना सांगितले आहे.