दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार : 2 पोलीस हुतात्मा, 12 जखमी
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर हल्ला केला. या गोळीबारात दोन पोलीस हुतात्मा झाले असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार दुचाकीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी बसवर बेछूट गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले असून त्यांच्या शोध घेतला जात आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर हल्ला केल्यानंतर पोलिसांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.
श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात झेवानजवळ दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला. सशस्त्र पोलीस बटालियनच्या बसवर हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी या बसवर मोठय़ा प्रमाणात गोळीबार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांची ही बस बुलेटप्रुफ नव्हती. त्यामुळे या हल्ल्यात पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले. हल्ला झाल्यानंतर पोलीस दलाने या संपूर्ण परिसरास वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू केली आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱया वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. तसेच शहराबाहेर नाकाबंदी करण्यात आली आहे.
पोलिसांची बस बुलेटप्रूफ नव्हती
दहशतवादी हल्ला झालेली बस बुलेटप्रूफ नव्हती. तसेच बहुतांश पोलीस कर्मचाऱयांकडे शस्त्रेही नव्हती. फार कमी पोलिसांकडे बंदुका-रायफल्स होत्या. बस थांबवण्यासाठी दहशतवाद्यांनी टायरवर गोळीबार केला. त्यानंतर बसवर दोन्ही बाजूंनी बेछूट गोळीबार करण्यात आल्याची माहिती सुरक्षा दल प्रवक्त्याकडून हल्ल्यानंतर देण्यात आली. माजी डीजीपींनी या हल्ल्याला सुरक्षेतील मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. जिथे हा हल्ला झाला तिथे सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि जेकेपीचे कॅम्प आहेत. सदर भागात नेहमी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतो. अशा स्थितीतही हल्ल्याची घटना घडणे आश्चर्यजनक असल्याचे म्हटले आहे. ही एक मोठी सुरक्षा त्रुटी असल्याचे दिसते. पोलीस जवानांकडे नेहमी शस्त्रे असायला हवीत, मात्र बहुतांश पोलिसांकडे शस्त्रे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंतप्रधानांनी मागवली हल्ल्यासंबंधीची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. हल्ल्यात जखमी झालेले जवान लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची माहिती मागवली आहे. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सुरक्षा जवानांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी शोकसंवेदनाही व्यक्त केल्या.
दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
श्रीनगर आणि परिसरात दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. गेल्या दोन दिवसात येथे 3-4 ठिकाणी कारवाई करण्यात आली. सोमवारीही दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. दहशतवादी कारवाया वाढल्या असल्या तरी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.