कारवाईचा दंडुका चार लोकांमागे लावता कसा ? प्रविण शहाणे यांचा सवाल
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाला रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा खास लागू केला आहे. परंतु हा कायदा केवळ सर्वसामान्यांवर दंडुका उगरण्यापूरता आहे. पोलिसांना केवळ चारच कसे आंबे विक्री करणारे आणि भाजी विक्री करणारे सापडले. शहरात कायदा मोडणारे गल्लोगल्ली आहेत. कारवाईचा दंडुका केवळ ठराविक नागरिकांच्या पाठीत का?, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रविण शहाणे यांनी केला आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा मोडणारे मातब्बर आहेत. त्यांच्यावर कायद्याचा जरब बसवणे, राबवणे हे बाजूला राहिले परंतु अलीकडे शाहूपुरी पोलीस उगाच कोणावर ही कायद्याचा बडगा उगारत आहे. कोरोनामुळे संचारबंदी आहे. या संचारबंदीचे तीन तेरा सातारा शहरात अगदी सुरुवातीपासून वाजले आहेत. दारू बंदी होती तेव्हा दारू विक्री सुरू होती. गुटखा विक्री सुरू आहे. यावर कुठे कारवाई झाल्याचे पाहिले नाही. ज्या विक्रेत्यांवर कारवाई केली त्यांचा तसा काय गुन्हा. इतरांनी शहरात कायदा पायदळी तुडवला जात आहे. त्यांच्यावर कार्यवाही केली जात नाही. काही ठराविक नागरिकांना तेवढा धाक दाखवला जात आहे. शाहूपुरी पोलिसांनी जरा पारदर्शकता राबवली तर आम्ही त्यांच्या सोबत राहून त्यांना लागेल ती मदत करू. कारवाई करायचीच असेल तर ती सरसकट करा दोन चार नागरिकांवर नको. एक तर करायचे असेल तर सारे बंद करा नाही सारे तरी चालू करा. नियम कायदा फक्त ठराविक नागरिकांसाठी आहे का असा ही सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रविण शहाणे यांनी उपस्थित केला आहे.