रक्तपात झाला तरी चालेल पण आता माघार नाही – राजू शेळके यांचा इशारा
प्रतिनिधी/ सातारा
अन्यायकारक पद्धतीने वीज बिल शेतकऱयांवर लादले गेले आहे. ते बेजबाबदार मंत्र्यांच्यामुळे थकले आहे. त्याला मंत्रीच जबाबदार आहेत. 21 ते 22 टक्याने व्याज नरडीवर पाय ठेवून वसुल करता लाजा वाटत नाहीत. कोण बिनडोक मंत्री सांगतो म्हणून जनतेला त्रास द्याल तर तुमचं डोकं ठिकाणावर आणले पाहिजे, असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन महावितरणच्या कृष्णानगर कार्यालयासमोर केले. या आंदोलनात पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची उचलबांगडी करत पोलीस गाडीत कोंबले. त्याबाबत नाराजी व्यक्त केली.
महावितरण कार्यालयाच्यासमोर महावितरण कंपनीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेळके, अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत केले. या आंदोलनामुळे वाहतुकीची केंडी झाली होती. दरम्यान, पोलिसांनी आंदोनकर्त्यांना विनंती करुन पोलीस गाडीत बसण्यास सांगितले. परंतु पोलिसांनी विनंती करताच पदाधिकारी म्हणाले, आम्ही चालत येतो, गाडीतून येणार नाही. त्यावर पोलिसांनी ढकलत कार्यकर्त्यांनी गाडीत कोंबले.
यावेळी बोलताना राजु शेळके म्हणाले, आज सर्वसामान्य लॉकडाऊनमुळे पिचला आहे. महावितरणची बिले अवाच्या सव्वा आलेली आहेत. ही बिलाच्या विरोधात स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. लाईट बील थकण्याला सरकारमधील मंत्री कारणीभूत आहेत. त्यांनी त्यावेळी घोषणा केल्यामुळे लाईट बील थकले आहे. ही लाईट बीले अवाच्या सव्वा बीले वाढवून देवून वसुली केली जात आहेत. ही वसुली थांबवण्यात यावी, अन्यथा आम्हालाही वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा दिला आहे.