सरकारकडून पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रकार : मनसेचे परशुराम उपरकर यांचा आरोप
सत्ता असूनही कारवाई होत नसल्याने शिवसेना कार्यकर्तेही बुचकळय़ात!
वार्ताहर / कणकवली:
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दिवस-रात्र सेवा बजावणाऱया पोलिसांवर हात उचलूनही संशयितांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे सत्ता असूनही 2005 च्या शिवसैनिकांचे खच्चीकरण केले जात आहे. कणकवली नगराध्यक्ष व त्यांच्या सहकाऱयांनी पोलिसांना दिलेली वागणूक निंदनीय आहे. या दहशतीच्या विरोधात 2005 मधील जे निष्ठावान शिवसैनिक उभे राहिले होते, ते या संशयितांना अद्याप अटक झाली नसल्याने सत्तेबाबत विचारात पडले आहेत, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर म्हणाले, 2005 च्या निवडणुकीत राज्यातील शिवसैनिक व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही येथील दहशत अनुभवली होती. असे असताना या प्रकरणात अद्याप संशयितांना अटक का करण्यात आली नाही? त्यामुळे दोनवेळा निवडून आलेले आमदार, खासदार यांचे विरोधकांशी साटेलोटे आहेत का? असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक शिवसैनिकांनी माझ्याकडे याबाबत व्यथा मांडल्या आहेत. कोरोनासारख्या गंभीर विषयावर पोलीस व प्रशासन उत्कृष्ठ काम करत असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधी पोलिसांच्या पाठिशी राहत नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱयांकडून या घटनेला प्रोत्साहनच देत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी आपल्यावर हात उचलणाऱयांवर व वर्दीची भाषा करणाऱयांवर गुन्हा दाखल करून धाडस दाखविले आहे. मात्र, पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रकार सुरू आहे.
2005 मध्ये ज्या शिवसैनिकांनी पोलिसांचा मार खाल्ला, त्या शिवसैनिकांवर खोटय़ा केसीस दाखल होऊन पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या पाठी लागला होता. त्यावेळी दाजी सावजी यांच्या घरात रिव्हॉल्व्हर मिळाल्याची खोटी केस दाखल करण्यात आली. उमेश कोरगावकर यांच्यावर हल्ला होऊन त्यांचे पाय तुटले पण त्या मारेकऱयांवर 307 सारखे गुन्हे दाखल झाले नाहीत. त्या सत्तेच्यावेळी एकतर्फी पोलीस कारवाई सुरू होती. अशावेळी आता सत्ता आल्याने निदान संशयितांवर कारवाई होईल, अशी शिवसैनिकांची अपेक्षा असताना सत्ताधारी आमदार-खासदार यांच्याकडून शिवसैनिकांचा अपेक्षाभंग झाला आहे, अशी टीका उपरकरंनी केली.