मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे प्रतिपादन : पोलीस ध्वज दिन कार्यक्रमात सहभागी
प्रतिनिधी / बेंगळूर
पोलिसांच्या कल्याणाबरोबरच खात्याच्या आधुनिकीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. पोलिसांच्या कल्याणासाठी आरोग्यभाग्य योजना जारी करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांना विविध इस्पितळांमध्ये उपचार घेण्यासाठी 200 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिली.
बेंगळूरच्या कोरमंगल येथील केएसआरपी मैदानावर आयोजित पोलीस ध्वज दिन कार्यक्रमप्रसंगी पोलीस पथकांकडून मानवंदना स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. निवृत्त पोली अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या आरोग्य सेवेसाठी 20 कोटी रु. राखून ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी साडेसात कोटी रु. मंजूर करण्यात आले आहेत. पोलिसांच्या निवास व्यवस्थेसाठी 1,034 कोटी रुपये देण्यात आले असून टप्प्याटप्प्याने पोलीस वसतीगृहे बांधण्यात येतील, असे ते म्हणाले.
राज्यात अत्युत्तम सेवेत कर्नाटक पोलीस खाते आघाडीवर आहे. गुन्हे नियंत्रण, तपास आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सणासुदीच्या काळात पोलीस अपेक्षा न ठेवता परिश्रम घेतात. मागील दीड वर्षात कायदा-सुव्यवस्थेत पोलिसांचे योगदान उल्लेखनीय आहे. नक्षलवाद आणि दहशतवाद विरोधी मोहितेमतही उत्तम कार्य केले आहे, असेही ते म्हणाले.
पोलीस स्थानकांसाठी नव्या पाच वर्षात इमारती
राज्यातील स्वतःची इमारत नसलेल्या 100 पोलीस स्थानकांना पुढील पाच वर्षात नव्या इमारती बांधून देण्यात येतील. त्याकरिता 200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया योजनेंतर्गत 667 कोटी रु. खर्चाच्या विविध सुरक्षा व्यवस्था हाती घेतल्या जाणार आहेत. किनारपट्टी भागात सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येतील, असे आश्वासनही मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिले.
प्रत्येक जिल्हय़ात एफएसएल लॅब
राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात एफएसएल लॅब (विधिविज्ञान प्रयोगशाळा) निर्माण करण्याचा विचार सुरू आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींना स्वसंरक्षणासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपल्या पोलिसांनी सर्व प्रकारच्या आव्हानांना यशस्वीपणे तोंड दिले आहे, असे प्रतिपादनही येडियुराप्पा यांनी केले.
ड्रग्ज जाळय़ांचा बिमोड करण्यात यश
कर्नाटक पोलिसांनी अनेक प्रकरणांमध्ये अत्यंत कुशलपणे तपास केला आहे. पोलीस तपासाबद्दल काही जण टिका, टिप्पणी करत आहेत. मात्र, त्यामुळे विचलित न होता पोलिसांनी आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आवाहन गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी केले. राज्यात काही वर्षांपासून ड्रग्जचा अवैध व्यवसाय वाढला आहे. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस खात्याने अथक परिश्रम घेतले आहे. ड्रग्ज जाळय़ांचा बिमोड करण्यात पोलीस खाते यशस्वी ठरले आहे, असेही ते म्हणाले.