व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनसह सदस्यावर निवती पोलिसांची कारवाई
वार्ताहर / कुडाळ:
पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्सऍपद्वारे मेसेज फॉरवर्ड केल्याप्रकरणी निवती पोलीस ठाण्यात ग्रुप ऍडमिनसह एका सदस्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय माहितीनंतर कसून चौकशी करीत निवती पोलिसांनी ही कारवाई केली. या बाबतची फिर्याद हवालदार सुनील रामचंद्र सावंत यांनी दिली.
या गुन्हय़ातील संशयित संतोष घन:श्याम पाटील व हरेश गोपाळ ठाकुर (दोन्ही रा. आंदुर्ले) आहेत. संतोष पाटील ‘आमचा वॉर्ड’ नावाच्या ग्रुपचा ऍडमिन आहे. हरेश ठाकुरसह त्या ग्रुपवर अन्य पासष्ट सदस्य आहेत. पिंगुळी-करमळगाळू येथील बेकायदा दारू वाहतूक करणारी कार व मोटारसायकल यांच्यामध्ये अपघात झाला होता. या घटनेची एका सोशल मीडियावर एका न्यूज चॅनेलने प्रसिद्ध केलेली बातमी ग्रुप सदस्य संतोष परब यांनी 15 मार्च 2020 रोजी यांनी या ग्रुपवर फॉरवर्ड केली. त्यावर ग्रुप ऍडमिन पाटील याने पोलीस अधिकारी व खात्याविरोधात त्याच ग्रुपवर माहिती प्रसारीत केली. त्याला ठाकुर याने पोलीस खात्याची बदनामी करणारी माहिती टाकून पाटील याच्या म्हणण्याला प्रोत्साहन दिले.
ही माहिती मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्सऍपद्वारे प्रसारित झाल्याचे निवती पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून समजले. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱयांच्या कानावर ही बाब घालून सुनील सावंत यांनी कसून चौकशी सुरू केली. ‘आमचा वॉर्ड’ ग्रुपमधील सदस्यांकडे चौकशी केली व त्यांच्याकडील मोबाईल तपासले. तेव्हा संशयित पाटील व ठाकुर या दोघांनी पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने मेसेज फॉरवर्ड केल्याची खात्री झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम व निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
मोबाईलच्या माध्यमातून चुकीचे मेसेज पाठविले. तसेच लोकांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक (सिंधुदुर्ग) व पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने व्हॉट्सऍपद्वारे माहिती प्रसारित केल्याप्रकरणी भादंवि कलम 500, 505 (2), पोलीस (अप्रतीची भावना चेतावणे) अधिनियम 1922 कलम 3, माहिती-तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 अन्वये पाटील व ठाकुर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास वेंगुर्लेचे पोलीस निरीक्षक श्री. मेरे करीत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर निवती पोलिसांनी कारवाईच्यादृष्टीने कडक पावले उचलली. विनाकारण दुचाकीने फिरणाऱयांनाही दणका दिला. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत 14 गुन्हे दाखल केले आहेत, तर 23 वाहने जप्त केली आहेत.