रंकाळा तलावात घेतली उडी ; महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले त्याचे प्राण
राजेंद्र होळकर / कोल्हापूर
करवीर पोलीस ठाण्यातील एका हवलदाराने खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देवून केलेल्या मारहाणीची तक्रार नोंद करुन न घेतल्याच्या निषेधार्थ कळंब्यातील ( ता. करवीर ) युवकाने शनिवारी ( १२ सप्टेंबर ) दुपारी रंकाळ्यात उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुनिल शांताराम बागम ( वय ३८, रा. जयहिंद कॉलनी, कत्यायनी कॉम्लेक्स, कळंबा, ता. करवीर, जि. कोल्हापूर ) असे त्याचे नाव आहे. रंकाळ्यावर असलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी समयसुचकता दाखवून रंकाळ्यात उड्या घेवून बुडणाऱ्या या युवकाला वाचविले.
या विषयी पोलिसांच्यातून समजलेली अधिक माहिती अशी, करवीर पोलीस ठाण्यामधील बरगे नामक हवलदाराने कळंबा येथील जयहिंद कॉलनीमधील कत्यायनी कॉम्लेक्समध्ये राहणारा सुनिल बागम या युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देवून मारहाण केली आहे. या विषयी हवलदार बरगे विरोधी तक्रार नोंद करुन घ्यावी, अशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ या युवकाने शनिवारी दुपारी रंकाळ्यात जल आंदोलन करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महानगरपालिकेला निवेदनाद्वारे कळविले होते. त्यामुळे शनिवारी सकाळपासून रंकाळ्यावर पोलिसांच्याबरोबर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि कर्मचारी बंदोबस्ताकरीता तैनात केले होते.
या सर्वाचा नजरा चूकवून सुनिल बागमने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रंकाळा तलावात आत्महत्या करण्यासाठी उडी टाकली. ही बाब बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आली. त्यांनी समयसुचकता दाखवून रंकाळ्यात उड्या घेवून सुनिल बागम या बुडणाऱ्या या युवकाला वाचविले. या प्रकरणी त्याच्याविरोधी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.