प्रतिनिधी/ काणकोण
कोविड-19 च्या महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद केलेला पोळे चेकनाका 1 सप्टेंबरपर्यंत खुला केला नाही, तर 5 सप्टेंबरपासून आंदोलनाला उग्र स्वरूप देत राष्ट्रीय हमरस्ता अडवून ठेवला जाईल. गोव्यात नोंदणीकृत एकाही वाहनाला कारवारमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. कारवारहून गोव्यात येणारी भाजी, दूध आणि मासेवाहू वाहने अडवून ठेवली जातील, असा स्पष्ट इशारा कारवारच्या नागरिकांनी दिला आहे.
विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी रघू नाईक यांच्या नेतृत्वाखाली 29 रोजी पोळे चेकनाक्यावर आंदोलन करण्यात येऊन त्यात कारवार, कुमठा, अंकोला येथील रिक्षा, टॅक्सी युनियनचे पदाधिकारी, स्थानिक पंचायतांचे सदस्य आणि विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले.
कारवार आणि गोव्याचे पारंपरिक भावनिक संबंध आहेत. कित्येक वर्षांपासून गोवा आणि कारवार भागात रोटी-बेटी व्यवहार चालू आहेत. आपल्याला गोवा आपलाच वाटतो. एखादे गोव्यातील वाहन कारवारमध्ये अपघातग्रस्त झाल्यास कारवार भागातील लोक आजवर सहकार्य करत आलेले आहेत. कारवार आणि अन्य भागांतील कित्येक लोक गोव्याच्या विविध भागांमध्ये स्थायिक आहेत. कारवार आणि अन्य भागांतील लोक वैद्यकीय सेवेसाठी गोव्यात जाणे पसंत करतात. कित्येक जण सरकारी इस्पितळांत उपचार घेत आहेत. त्यांना सध्या औषधे मिळत नाहीत. यंदाची गणेश चतुर्थी साजरी करायला मिळालेली नाही. कारवार भागातील दूध, मासळी, भाजी चालते, मग माणसांनाच आडकाठी का, असा सवाल यावेळी बोलताना रघू नाईक, भास्कर बडिगार, संतोष नाईक, संजू म्हाळशेकर, दिलीप नाईक या विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी केला.
गोवा सोडून इतरांकडून चेकनाके खुले : नाईक
केंद्र सरकारच्या आदेशानुसार गोवा सोडून इतर सर्व राज्यांनी आपले चेकनाके खुले केले आहेत. गोव्यात यायचे झाल्यास कोविड निगेटिव्ह दाखला मागितला जातो, 14 दिवस विलगीकरणात राहण्याची अट घातली जाते आणि 2 हजार रुपये फी आकारली जाते, याकडे रघू नाईक यांनी लक्ष वेधले.
पोळे चेकनाक्यावर कारवारच्या संघटना आंदोलन करणार याची माहिती मिळताच काणकोणचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू, मामलेदार विमोद दलाल, पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण, उपनिरीक्षक धीरज देविदास, साहाय्यक उपनिरीक्षक प्रदीप राणे आणि अन्य पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेसाठी उपस्थित होते. तर कारवारच्या बाजूने चित्ताकुला पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रवीण कुमार, उपनिरीक्षक नित्यानंद आणि अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोळे येथील चेकनाक्याजवळचे कोविड केंद्र पाहू देण्याची विनंती यावेळी रघू नाईक आणि त्यांच्या प्रतिनिधीने केली तसेच गोवा सरकारला निवेदन देण्याची विनंती केली. मात्र उपजिल्हाधिकारी प्रभू यांनी दोन्ही गोष्टी फेटाळून लावल्या.
सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन
हा दोन राज्यांचा प्रश्न असून आपले जे काही निवेदन असेल ते कारवारच्या जिल्हाधिकाऱयांना सादर करावे. त्यानंतर कारवारचे जिल्हाधिकारी ते दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांना पाठवतील आणि सरकार त्यावर काय तो निर्णय घेईल, असे यावेळी प्रभू यांनी स्पष्ट केले. कोविड-19 च्या अनुषंगाने पोळे चेकनाक्याच्या बाबतीत जे गैरसमज पसरविले जात आहेत ते दूर करण्यासाठी त्यासंबंधीची सविस्तर माहिती त्यांनी दिली. गोवा सरकारने कोविड-19 च्या बाबतीत जी मार्गदर्शक तत्त्वे लागू केलेली आहेत त्यांचे पालन या ठिकाणी केले जाते. त्याचप्रमाणे कोविडची चाचणी मडगावला केली जाते. ज्यांच्याकडून पैसे घेतले जातात त्यांना रीतसर पावती दिली जाते, अशी माहिती प्रभू यांनी यावेळी दिली आणि आंदोलनकर्त्यांचे तोंड बंद केले.
दरम्यान कारवारच्या आमदार रूपाली नाईक यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी याबाबतीत चर्चा केलेली असून येत्या एक-दोन दिवसांत यावर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे. जर तोडगा काढला गेला नाही, तर मात्र ठरल्याप्रमाणे 5 सप्टेंबरपासून उग्र आंदोलन करण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार नाईक यांनी यावेळी केला. कोरोनामुळे सध्या अगदी कमी संख्येने नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. 5 रोजी ही संख्या हजाराच्या घरात जाईल, असा इशारा त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.