मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचा सत्कार
सातारा प्रतिनिधी
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रमात” सर्वोत्कृष्ट कार्यकृती करणाऱ्या जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिली. या उपक्रमांमध्ये योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
पोषण अभियानमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल महाराष्ट्राच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी विशेष पत्राद्वारे श्री.गौडा यांचे अभिनंदन केले आहे .जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी प्रथम क्रमांकाचा सन्मान स्वीकारण्यासाठी मुंबई येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प च्या आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या संबंधीत अधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खास पत्राद्वारे निमंत्रण दिले आहे .या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, “एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राबविण्यात येणार्या पोषण अभियान जन आंदोलन कार्यक्रमात जास्तीत जास्त उपक्रम म्हणजेच “सर्वोत्कृष्ट कार्यकृती” करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे.
जागतिक महिला दिनादिवशी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कोविड महामारीच्या कालावधीत सर्वोत्कृष्ट काम करणारे जिल्हे व जिल्ह्यातील संबंधित अधिकारी यांचा मुंबई मधील सह्याद्री अतिथीगृह येथे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, महिला व बालविकास खात्याचे मंत्री तसेच राज्यमंत्री या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. असे नमूद करून पत्रामध्ये विशेषत्वाने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी आयोजित सन्मान सोहळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अधिनस्त जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. या उज्वल यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सर्व अधिकारी कर्मचार्यांचे आभार मानले आहेत. आणि अभिनंदन केले आहे तसेच “पोषण अभियान जन आंदोलन” कार्यक्रमात इथून पुढे देखील सातारा जिल्हा परिषद जास्तीत जास्त विधायक दृष्टिकोन ठेवून उपक्रम राबवित राहील, अशी ग्वाही दिली आहे.