सांगली / प्रतिनिधी
योग्य पोषण आहार मिळाल्याने मुलांची शारिरीक व मानसिक वाढ होते. त्यांची प्रतिकार शक्ती वाढते. त्यासाठी मुळात पालकांनी पोषण आहाराचे महत्त्व समजून घेतले पाहिजे असे प्रतिपादन अश्विनी कुलकर्णी यांनी केले. एकात्मिक बालविकास योजना सांगलीच्या अंगणवाडी क्रमांक ४७ येथे आयोजित केलेल्या हळदी कुंकू व विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अश्विनी कुलकर्णी यांनी पालकांना अंगणवाडीचे महत्व, लहान बालकांना देण्यात येणारे पोषक आहार,आरोग्य निगा,शाळा पूर्व शिक्षण याबाबत पालकांना समुपदेशन केले.
यावेळी अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका सौ. सुमन मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण सौ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महिला पालकांचा हळदी कुंकू समारंभ उत्साहात झाला. अंगणवाडी सेविका सौ. शैलजा कांबळे व ज्योत्स्ना गोंधळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. कांबळे यांनी केले तर सौ. रेश्मा सवने यांनी आभार मानले. यावेळी अंगणवाडी मुले आणि त्यांचे पालक उपस्थित होते.