पंचायत समिती सदस्यांचा मासिक सभेत आक्षेप : मुख्याध्यापकांची बैठक घ्यावी-प्रभारी सभापती मयेकर
प्रतिनिधी / रत्नागिरी
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुरवठा केल्या जाणाऱया पोषण आहाराचे धान्य मुख्याध्यापकांनी तपासून घेणे अत्यावश्यक आहे. पण काही मुख्याध्यापक पोषण आहार न तपासताच त्याचे वाटप करून जबाबदारीतून मोकळे होतात. यासाठी तालुक्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन खराब पोषण आहार न स्वीकारण्याच्या सूचना प्रभारी पंचायत समिती सभापती दत्तात्रय उर्फ बाबू मयेकर यांनी दिल्या.
रत्नागिरी पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा प्रभारी सभापतीपदाचा कार्यभार हाती घेताच बाबू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पार पडली. या सभेत शालेय पोषण आहार पुरवठय़ाचा विषय प्रकर्षाने सदस्यांनी उपस्थित केला. चर्चेवेळी गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते यांनी शाळांना पोषण आहार पुरवठा गेल्या जानेवारीपर्यंत करण्यात आल्याचे सांगितले. फेब्रुवारी, मार्च व एप्रिल या महिन्यांसाठी पोषण आहाराची मागणी करण्यात आली आहे. या बाबत संबंधित धान्य गोदामाला दिलेल्या भेटीवेळी धान्यसाठा गोदामात उपलब्ध झालेला नसल्याचे मोहिते यांनी सांगितले.
पोषण आहार विद्यार्थ्यांना वितरित केला जात असता त्यातील धान्य शिजत नसल्याचा आक्षेप घेण्यात सदस्यांनी सदस्या जयश्री जोशी आदींनी घेतला. अशाप्रकारे जर खराब धान्य मिळत असेल तर त्याची योग्य खातरजमा करावी. पोषण आहाराचे धान्य ज्यावेळी उपलब्ध होईल, त्यावेळी ते पं.स. सदस्यांना दाखवण्यात यावे. ते चांगले दर्जाचे आहे का, याची खात्री करा मग वाटप करावे, अशा सूचना सदस्या स्नेहा चव्हाण यांनीही केल्या. पोषण आहार हा तपासून घेतला पाहिजे, पण काही मुख्याध्यापक न तपासताच विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करतात. त्यासाठी मुख्याध्यापकांची बैठक घेतली जाऊन त्यांना सूचना कराव्यात, असे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य सुनील नावले यांनी केल्या. त्या विषयी मुख्याध्यापकांची बैठक घेतली जावी, अशा सूचना प्रभारी सभापती बाबू मयेकर यांनी गटशिक्षणाधिकाऱयांना केल्या आहेत.
कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित 28 गावे येतात. पण या केंद्रात नियुक्त असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. लेले यांना कोरोना डय़ुटीचे कारण दाखवून कामगिरीवर काढण्यात आल्याचा आक्षेप ज्येष्ठ सदस्य गजानन मयेकर यांनी घेतला आहे. कोतवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती असताना डॉ. अनिरुद्ध लेले यांची तोंडी आदेशाने पावस प्राथमकि आरोग्य केंद्रात बदली करण्यात आली आहे. त्यांना मूळ जागेवर घ्यावे. अन्यथा कोतवडे केंद्राला नवा वैद्यकिय अधिकारी द्या, अशी मागणी गजानन पाटील यांनी केली. कोरोना काळात उत्तम सेवा डॉ. लेले यांनी दिलेली असताना त्यांना जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी 2 वेळा नोटीस देते. ते जि. प. आरोग्य विभागाच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तर जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी खोटी माहिती देवून पावस ग्रामस्थांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही पाटील यांनी सभेत केला. त्यावेळी सदस्य सुनील नावले यांनी पावस प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱयांचा विषय सभेत उपस्थित केला होता. जि. प. समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांगाना देण्यात येणाऱया वैयक्तीक लाभाच्या योजनेसाठी आपल्या गणातील लाभार्थ्यांचे अर्ज गटविकास अधिकाऱयांनी प्रलंबित ठेवल्याचा आक्षेप मावळत्या सभापती प्राजक्ता पाटील यांनी घेतला. जिल्हा परिषदेकडे वेळेत प्रस्ताव न पाठविल्याने सौ.पाटील सभेत आक्रमक झाल्या होत्या. मागासवर्गीयांसाठी 15 टक्के लाभाच्या निधीचे परिपत्रक प्रशासनाला प्राप्त झालेले आहे. पण त्याचे 9 महिने मागणी करूनही वाचन झालेले नसल्याने सदस्य उत्तम सावंत यांनी जाब विचारला. आज तालुक्यात काही मार्गावरील एसटी बस फेऱया बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळांमध्ये वेळेत पोहचण्यात अडचण उभी राहत असल्याने त्या तत्काळ सुरू केल्या जाव्यात, अशी मागणीही सदस्यांनी केली.
शिरगाव स्वरूपानंद नगर परिसरातील पाणी नमुने तपासावेत
शहरानजिकच्या शिरगाव तिवंडेवाडी-स्वामी स्वरूपानंदनगर परिसरात एमआयडीसीतील कारखाने व लगतच्या सोसायटय़ातील सांडपाण्याने पिण्याच्या पाणी विहीरी दुषित झालेल्या आहेत. त्या विहीरींच्या पाण्याचे नमुने तातडीने तेथील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तपासले जावेत अशी मागणी सदस्या स्नेहा चव्हाण यांनी या सभेत आरोग्य अधिकाऱयांकडे केली.