राजू चव्हाण/ खेड
गेल्या 10-12 दिवसांपासून तालुक्यात पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे बळीराजा मशागतीच्या कामात गुंतला आहे. पावसाची संततधार सुरूच असल्याने भात रोपांची चांगली वाढ होत असून येत्या काही दिवसांतच भात लावणीस प्रारंभ होणार आहे. तालुक्यातील पोसरे-सडेवाडीतील ग्रामस्थांनी मात्र पावसाच्या लहरीपणावर एकप्रकारे मात करत साठवण टाकीतील पाण्यावर भात लावणीचा श्रीगणेशा केला आहे. यासाठी ग्रामस्थांनी नैसर्गिक स्त्रोत अडवण्यास प्राधान्य दिले असून वाडीतील ग्रामस्थांचेही हात सामुदायिक शेतीतच राबत आहेत.
कोकणात भातशेतीच्या लागवडीची मदार पावसावरच अवलंबून असते. मे महिन्याच्या अखेरीस पावसाने वर्दी देताच पेरणीचा हंगाम सुरू होतो. यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस बरसल्यानंतर भात रोपांची वाढ झाल्यावर जूनअखेरीसपासून भात लावणीस प्रारंभ होतो. पावसाच्या लहरीपणामुळे वर्षानुवर्षे भात लावणीचा हंगाम अनिश्चित बनला आहे. यंदा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सारेच ठप्प असताना शेतीची कामे उरकायची कधी याच विवंचनेत बळीराजा होता.
पोसरे-सडेवाडीतील ग्रामस्थ मात्र वर्षानुवर्षे सतावणाऱया चिंतेला बगल देत समृद्ध सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून सामुदायिक शेतीत राबत आहेत. 25 मेपासून साठवण टाकीच्या पाण्यावरच भात पेरणीस सुरूवात केली. पोसरे-सडेवाडीत 12 घरे व 45 च्या आसपास लोकवस्ती आहे. लोटे येथील स्वामी विवेकानंद रिसर्च ऍण्ड ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट (एक्सेल कंपनी) व जलनायक राहुल तिवरेकर यांच्या सहकार्यातून 700 मीटर उंच डोंगरावर असणारे झरे एकत्र करून भूमिगत बंधारा व हौद बांधण्यात आला आहे.
जलवर्धिनी प्रतिष्ठानचे उल्हास परांजपे यांच्या माध्यमातून 25 हजार लिटर क्षमतेची फेरोसिमेंट टाकी उभारण्यात आली आहे. याशिवाय 3 हजार लिटर क्षमतेच्या 10 साठवण टाक्यांचाही समावेश आहे. या साठवण टाक्यातील पाण्याचा वापर भात लागवडीसाठी करण्यात येत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे बऱयाचवेळा बळीराजाच्या नजरा आकाशाकडे खिळतात. या ग्रामस्थांनी मात्र पावसाची वाट न पाहता साठवण टाक्यातील पाण्याचा वापर करत भातशेती फुलवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
गेल्या चार दिवसांपासून याठिकाणी भात लावणीच्या कामाचा श्रीगणेशा झाला आहे. ग्रामस्थांचे हात एकमेकांच्या शेतीत राबत असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 3 हेक्टर जागेत भातशेती पिकवून मिळणाऱया उत्पन्नातून ग्रामस्थ कुटुंबाचा रहाटगाडा हाकतात. भातशेतीपाठोपाठ ग्रामस्थ हळद, सुरणाची लागवड करत उत्पन्न घेत आहेत. यासाठी प्रत्येकाच्या घरासमोर 3 हजार लिटर क्षमतेची साठवण टाकीदेखील आहे. वाडीतील सर्वच ग्रामस्थ ही लागवड करत असल्याने आर्थिक डोलाऱयाला उभारी मिळत आहे.