प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील पोसरे बुद्रूक-सडेवाडी येथील ग्रामस्थ वनीकरणासाठी पुढे सरसावले आहेत. लोकसहभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने गेल्या तीन वर्षात तब्बल 5 हजार रोपांची लागवड करण्याची किमया केली आहे.
विनायक झोरे यांच्या माध्यमातून स्थानिक व मुंबईस्थित ग्रामस्थ विविधांगी उपक्रम राबवण्यावर भर देत आहेत. वाडीला भेडसावणाऱया पाणीटंचाईवर लोकसहभागातून मात केली आहे. जलसंधारणासाठी अनेक उपाययोजना राबवताना 1 लाख लिटर पाणी साठवून ठेवण्यासाठी बांधकाम करण्यात आलेल्या 13 फेरोसिमेंट टाक्यांमुळे ही वाडी पूर्णपणे पाणीदार बनली आहे.
सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उदय भागवत, तौफीक मुल्ला, लक्ष्मण चितळे, अशोक ढाकणे तसेच अनुलोम संस्थेचे प्रथमेश पोमेंडकर, मनीषा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली 2018पासून ग्रामस्थांनी वनीकरणाची कास धरली आहे. पहिल्याच वर्षी 1500 रेपांची लागवड करून वनीकरणाची मुहूर्तमेढ रोवली. यामध्ये साग, बांबू, खैर, शिसम आदी रोपांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षात 5 हजार रोपांची लागवड करत इतरांपुढे अनोखा आदर्श निर्माण केला आहे.
याशिवाय नगदी पिकांचीही लागवड करण्यावर ग्रामस्थ भर देत असून हळद व सुरण यांचीही लागवड केली आहे. सरपंच अनंत साळवी, ग्रामसेवक संभाजी जाधव, सुरज गवई आदींचे उपक्रमास सहकार्य लाभले आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी दीपक झोरे, बजाजी करंजकर, गणेश महागांवकर यांनी प्रयत्न केले.