चुरशीच्या लढतींमध्ये टपाल मताला आले महत्त्व
प्रतिनिधी /पणजी
राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी टपालाने होणाऱया मतदानावर आता डोळा ठेवला असून ती मते मिळावित म्हणून आटापिटा चालवला आहे. उपलब्ध माहितीनुसार, टपाल मतदानासाठी सुमारे 41 हजार पेक्षा अधिक अर्ज मतदारांनी नेले असून त्यातील फक्त 12 हजारच्या आसपास मतदारांनी मतदान केले आहे. उर्वरीत सुमारे 28 हजार पेक्षा जास्त मतदारांचे मतदान बाकी असून ती मते मिळावित म्हणून राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांच्यात स्पर्धा चालू झाली आहे.
या टपाल मतदानाची प्रक्रिया मतमोजणीपर्यंत म्हणजे 10 मार्चच्या आदल्या दिवशी 9 मार्चपर्यंत चालू राहाणार आहे. त्यामुळे ती मते घेण्यासाठी राजकीय पक्ष, उमेदवारांची चढाओढ चालू राहाणार आहे. सदर टपाली मते मिळाल्यास एखादा उमेदवार हरु किंवा जिंकू शकतो म्हणून त्या मतांकडे मोठय़ा गांभिर्याने पाहिले जात असल्याचे चित्र आहे.
गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान यंत्रातून मते घालण्यात आली असली तरी टपाल मतदानाची प्रक्रिया चालू आहे. मतदान यंत्राची प्रक्रिया संपली असून ती मते मतदान यंत्रात बंदिस्त आहेत आणि 10 मार्च रोजी मतमोजणीच्या दिवशी ती उघड होणार आहेत. अनेक मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्याने आता टपाल मतदानास मोठे महत्त्व असून ते निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत म्हणून सर्व राजकीय पक्ष, उमेदवारांनी त्या मतांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
टपाल मतदानाला आले महत्व
या आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत टपाल मतदानाची प्रक्रिया होती परंतु त्या मतदानास फारसे महत्त्व नव्हते. तथापि या निवडणुकीत त्या मतदानास मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. ते मतदान ज्या उमेदवाराच्या राजकीय पक्षाच्या पारडय़ात पडणार त्या पक्षाला किंवा उमेदवारास विजयाची जास्त संधी आहे, अशी समीकरणे मांडण्यात येत असल्याने टपाल मते मिळविण्यासाठी आता जीवाचे रान करण्यात येत आहे.