झारखंड या राज्यात बेकायदेशीर धर्मांतरे करण्याचे प्रमाण बरेच अधिक आहे. वेगवेगळी प्रलोभने, पैशाचे आमिष, विदेशी नोकरीची लालुच, उच्चशिक्षणाचे आमिष किंवा धाकधपटचा आणि दबावतंत्राचा यांचा उपयोग करून गरीब आदिवासींचे धर्मांतर केले जाण्याच्या घटना घडतात. तथापि अशा वातावरणात राहूनही हिंदू धर्म न सोडलेल्या 75 वर्षीय वृद्धा मंजिली मरांडी या कौतुकाचा विषय बनल्या आहेत.
त्यांचे वास्तव्य हजारीबाग जिल्हय़ातील दिग्वार पंचायत क्षेत्रात असते. हा भाग आदिवासी बहुल आहे. हे आदिवासी पुरातन काळापासून येथे राहत आहेत. त्यांच्यापैकी बहुतेक जण हिंदू धर्म मानतात. तथापि त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकारही गेल्या 50 वर्षांपासून सुरू आहेत. आमिषांना बळी पडून धर्मांतर केल्यानंतर त्यांना वाऱयावर सोडले जाते. त्यामुळे मूळधर्मातही परतता येत नाही आणि नव्या धर्मात सन्मान मिळत नाही, अशी त्यांची कोंडी होते, अशा तक्रारीही अनेकदा केल्या गेल्या आहेत.
मंजिली मरांडी या भागातील लोकप्रिय कार्यकर्त्या असल्यामुळे त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्नही अनेकदा झाला. यासाठी त्यांना मोठमोठी आश्वासने देण्यात आली. पण त्या प्रलोबनांना बळी पडत नाहीत, असे पाहून दबावतंत्राचाही उपयोग करण्यात आला. तथापि या सर्वावर मात करत त्यांनी स्वधर्माशी एकनिष्ठ राहणे स्वीकारले आहे. त्यांचा आदर्श ठेऊन इतर असंख्य वनवासींनीही धर्मांतर नाकारले आहे. मंजिली मरांडी यांचे काही नातेवाईक दबावाला बळी पडून धर्मांतरीत झाले असूनही त्यांनी मात्र एकनिष्ठेने आपला हिंदू धर्म जपून ठेवल्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली असून त्यांची पंचक्रोशीत प्रशंसा होत आहे.