निवडणूक आयोगाकडून निर्बंध शिथिल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या देशात काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर कोरोनामुळे असलेले सर्व निर्बंध आता हटवण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने निवडणूक आयोगाकडून सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राजकीय सभांना पूर्वीप्रमाणे 50 टक्के उपस्थितीची मर्यादा हटवण्यात आली आहे. तसेच रोडशोला देखील आता पूर्ण क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे. मात्र, याचदरम्यान कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने किंवा राज्याने जारी केलेली प्राथमिक नियमावली पाळण्याची सूचनाही आयोगाने केली आहे.
कोरोनाची तिसरी लाट सुरू असताना उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. सध्या पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तथापि, उत्तरप्रदेशात अजूनही तीन टप्प्यात मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यासाठी बुधवारी मतदान झाले. आता उर्वरित तीन टप्प्यांसाठी रोड शोचे आयोजन करण्यात पूर्ण अनुमती मिळालेली आहे. तसेच मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 28 फेब्रुवारी आणि दुसऱया टप्प्यातील मतदान 5 मार्चला होणार असल्याने येथेही प्रचारावरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. देशातील कोरोनाबाधितांची घटती प्रकरणे पाहून निवडणूक आयोगाने मंगळवारी रात्री हा निर्णय घेतला. त्यानुसार आता प्रचारसभा आणि पदयात्रांसाठी निवडणूक आयोगाने पूर्ण सूट दिली आहे.