रात्री 2 वाजता फोन केला तरीही तो घेईन
काँग्रेस नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी सोमवारी रात्री अमृतसर पूर्व मतदारसंघात आयोजित विविध प्रचारसभांना संबोधित करत माफी मागितली आहे. माझ्यात अनेक त्रुटी असून त्याकरता माफी मागतो. या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करतोय. प्रामाणिकपणाने काम करण्यासाठी मला मतदान करा असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे.
मतदारसंघातील प्रचारसभांमध्ये बोलताना सिद्धू यांनी अकाली दल आणि विक्रम मजीठिया यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी स्वतःच्या चुकांची मतदारांसमोर कबुली देत लवकरच त्या सुधारणार असल्याचे म्हटले आहे. आपण मतदारांपासून 5 वर्षे दूर राहिलो, परंतु ही चूक आता आपण सुधारत आहोत. आता माझ्या मतदारसंघातील लोकांनी रात्री 2 वाजता फोन केला तरीही तो घेणार असल्याचे ते म्हणाले.
ब्राह्मण समुदायासाठी आदर
अनिल जोशी यांना काळा ब्राह्मण म्हणण्याप्रकरणी सिद्धू यांनी ब्राह्मण समुदायाची माफी मागितली आहे. काळा हा शब्द केवळ अनिल जोशींसाठी होता. ब्राह्मण समुदायासाठी माझ्या मनात आदर आहे. जर माझ्याकडून चूक झाली असल्यास मी माफी मागतो असे उद्गा सिद्धू यांनी काढले आहेत.
मजीठिया लक्ष्य
जर लोक घरोघरी अमली पदार्थ विकणाऱयांना पसंत करत असतील तर मला मतदान करू नका. परंतु प्रामाणिक माणूस हवा असल्यास मला मतदान करा असे म्हणत सिद्धू यांनी मजीठिया यांना लक्ष्य केले आहे. अकाली दलाचे नेते मजीठिया हे सिद्धू यांच्या विरोधात अमृतसर पूर्व मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. मजीठिया यांनी सिद्धू यांच्या विरोधात मोठे आव्हान उभे केल्याचे चित्र सध्या आहे.
पंजाबमध्ये आमची लढत आम आदमी पक्षासोबत
चढूनी यांचा दावा : आपने धनाढय़ांना दिली उमेदवारी
भारतीय किसान युनियनचे नेते गुरनाम चढूनी यांनी मंगळवारी मोहाली येथे पत्रकार परिषद घेत आम आदमी पक्षावर टीका केली आहे. पंजाबमधील शेतकरी सध्या आत्महत्या करतोय. सरबतासारखे पाणी विषय ठरले असून भुजलपातळी पाताळापर्यंत खालावल्याचे ते म्हणाले.
पंजाबमध्ये आमची मुख्य लढत आम आदमी पक्षासोबत आहे. आम आदमी पक्षाचे काम पाहिल्यास हा पक्ष पंजाबसाठी योग्य नसल्याचे वाटते. आपने मोठय़ा धनाढय़ांना उमेदवारी दिली आहे. मोहालीत सर्वात श्रीमंत व्यक्ती निवडणूक लढवतोय. पंजाबमध्ये आमचा पक्ष अनेक जागा जिंकणार असल्याचा दावा चढूनी यांनी केला.
पंजाबची जनता बदल घडवून आणू इच्छित आहे. खासदार, आमदाराला मोफत उपचार मिळतात, मग शेतकऱयांना का नाही. पंजाबमध्ये प्रत्येक तालुक्यात अमली पदार्थांनी शिरकाव केला आहे. रंगला पंजाब, आता कंगला पंजाब झाला आहे. देशात 20 कोटी लोकांना दोनवेळचे अन्न मिळत नाही. प्रथम उपासमारीने मारायचे, मग आटा-डाळ योजना जाहीर करायचा प्रकार सुरू आहे. शेतकऱयांना 500 रुपये दर महिना देत मते मिळविली जात आहेत. सरकार आता शेतकऱयांचा स्वाभिमान मारू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर स्वतःच्या पक्ष कार्यालयावरील हल्ल्यासंबंधी बोलताना त्यांनी आपला कुणाशीच वाद नसल्याचे म्हटले आहे.