राजषी शाहू महाराज यांची आज जयंती. महाराजांच्या जीवनावर, त्यांच्या कार्यपद्धतीवर नजर टाकली तर प्रजा राजा आहे, अशी त्यांची विचारसरणी होती. 1894 साली शाहूमहाराज करवीर राज्याच्या सिंहासनावर बसले. अस्पृश्यता, विमुक्त जाती, जातीभेद, शिक्षण, मुस्लीम समाज व त्यांचे प्रश्न असे अनेक प्रश्न महाराजांच्या समोर होते. हे सर्व विषय महाराजांच्या डोक्मयात थैमान घालत होते. परंतु, महाराजांचे व्यक्तिमत्त्व लाखात एक होते. सुप्रसिद्ध साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकर म्हणतात, ‘आपल्या पौराणिक ग्रंथातून वर्णन केलेल्या भीमकाय तेजस्वी आणि उग्र असा पुरुषश्रे÷ मी त्यापूर्वी वा त्यानंतर आजपर्यंत कधीही पाहिला नाही.’ त्यांची ईश्वरावर व धर्मावर असलेली श्रद्धा त्यांना समाज सुधारणा कामात उपयोगी पडली. त्यावेळी संस्थानिकांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी युरोपियन गव्हर्नेस ठेवण्याची पद्धत होती. त्यांच्याकडून पाश्चात्य शिक्षण व संस्कृतीचे ज्ञान दिले जात असे. ही मुले आपली संस्कृती व विचार, धर्मभावना विसरून देशबांधवांची हेटाळणी करणारी निर्माण होतात म्हणून त्यांना महाराजांनी दोन्ही पद्धतीचे शिक्षण देण्याचा आग्रह धरला होता. धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवादी भावना, सर्व समाज आपला ही भावना त्यांच्या नसानसात भिनली होती. नागपूरच्या बहिष्कृत समाजाच्या परिषदेत त्यांनी ‘अस्पृश्य समजले गेलेले लोक हिंदी राष्ट्राचे घटक-अवयव आहेत व समसमान हक्क असणारी भावंडे आहेत.’ ही भावना व्यक्त केली होती.
महाराजांनी तांबोळी, तेली, मुसलमान, लिंगायत समाजाला 50 टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. मागासलेल्या लोकांना शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून वसतीगृहे, राहण्या-जेवणाची मोफत व्यवस्था केली होती. 1896 साली उच्चशिक्षणासाठी आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा खर्च दरबारच्या खर्चातून होत असे. हिंदू संस्थानिकांनी समाजातील भटक्मया समाजातील मांग, गारुडी, फासेपारधी, छप्परबंद, कडबू इत्यादी लोकांना निरनिराळी कामे देऊन समाजात सामावून घेतले होते. ब्रिटिश काळात हा समाज आपल्या कामापासून वंचित झाला. पोटापाण्यासाठी चोरी-दरोडे घालू लागला. महाराजांच्या लक्षात ही गोष्ट आली. महाराज कल्पनेत रमणारे नव्हते. कृतीवर त्यांचा भर होता. अशा लोकांना त्यांनी गावात घरे बांधून दिली. कुंचीकोरवी समाज शिकारीत तरबेज होता. महाराज त्यांना शिकारीच्या वेळी आपल्यासोबत नेत असत. फासेपारधी म्हणजे खतरनाक गुन्हेगार अशी त्यांची ख्याती. महाराजांनी त्यांना माणसात आणण्याचे ठरविले व त्यांना आपल्या निवासस्थानातील संरक्षणाची जबाबदारी दिली. महाराज चोरात माणूस बघत असत. काळाच्या ओघात बालविवाह, विधवा विवाह हा प्रश्न सौम्य झाला आहे. महाराजांच्या काळात हा प्रश्न ज्वलंत होता. 1917 च्या जुलैमध्ये महाराजांनी आपल्या संस्थानात पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली होती व विवाहाची कायदेशीर नोंद झाली पाहिजे, असा कडक नियम केला होता. पडदा पद्धती महाराजांना मान्य नव्हती. वेदादी शास्त्रांचादेखील याला विरोध होता, असे विचार महाराजांनी 1919 मध्ये कानपूर येथे भरलेल्या कुर्मीक्षत्रिय परिषदेत मांडले होते. त्यांनी 12 जुलै 1919 रोजी आंतरजातीय विवाह कायदा केला होता. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असा विचार ते सातत्याने मांडत असत. महाराजांनी म. फुल्यांचा विचार प्रत्यक्षात आणला. शेतकरी शिकला तर त्याला आधुनिक शेतीवरील पुस्तके वाचून शेतीत सुधारणा करता येतील. प्रत्येक सैनिकाला शिक्षण आवश्यक आहे. कारण संग्राम शास्त्रातील पुस्तक वाचल्याने तो त्यात प्राविण्य मिळवेल. मराठा समाज हा जन्मजात योद्धा आहे. शिक्षणामुळे ते निष्णात योद्धे होतील, असा विचार महाराज मांडत असत. संस्कृत भाषेचा महाराजांना अतिशय अभिमान. 29 जुलै 1917 रोजी ‘छत्रपति महाविद्यालय’ हे संस्कृत कॉलेज सुरू केले. डॉ. कुर्तकोटी यांना त्याची जबाबदारी देण्यात आली. करवीर शंकराचार्य यांचे मार्गदर्शन ते घेत असत. मुस्लीम समाज प्रथमपासूनच शिक्षणाबद्दल उदासीन. महाराज इंग्लंड दौऱयावरून परतल्यावर कोल्हापुरातील मुसलमान समाजाने त्यांचा सत्कार केला. त्यावेळी महाराजांनी मुस्लीम समाजाला शिक्षणाचे महत्त्व सांगितले. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. परंतु, महाराजांनी तो विचार प्रत्यक्षात आणला. त्यांनी मुस्लीम समाजातील शिक्षणेच्छु दहा विद्यार्थ्यांना कोल्हापुरात सुरू असलेल्या व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगमध्ये प्रवेश दिला व मुस्लिमांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला. ही दोन्ही मुले राजाराम कॉलेजमधून पदवीधर झाली. महाराजांनी त्यांना ‘मामलेदार’ म्हणून नियुक्त केले. महाराजांनी शिकार, मल्लविद्या, संगीत, नाटय़, चित्रपट, चित्रकला या सर्वांना प्रोत्साहन दिले. असा जाणता राजा होणे नाही. शाहू महाराज म्हणजे परमेश्वरी अवतारच!
जयंतीनिमित्त या युगपुरुषाला मानाचा मुजरा! – शारदाचरण कुलकर्णी, बेळगाव