प्रतिनिधी / कुडाळ :
जावलीच्या हक्काचा प्रतापगड सहकारी साखर कारखाना सोळा वर्षाच्या करारावर किसन वीर सहकारी साखर कारखान्याने भाडेतत्वावर चालवण्यासाठी घेतला. मात्र तो उसाचे तीन हंगाम बंद ठेवल्यामुळे जावली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता किसनवीर प्रशासनाने प्रतापगड सहकारी साखर कारखाना हा पुन्हा संस्थापक संचालक व प्रतापगड मॅनेजमेंटच्या ताब्यात दिला नाही, तर वेळप्रसंगी प्रतापगड कारखाना ज्यांच्याकडे भाडेतत्त्वावर आहे, त्यांनी लावलेले टाळे तोडून ऊस उत्पादकांची ताकद दाखवू, असा धडक इशारा किसनवीर प्रशासनाला शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
कुडाळ (ता.जावली) येथे जरंडेश्वर कारखाना बचावासाठी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा झाला. त्यावेळी आमदार शशिकांत शिंदे बोलत होते. जरंडेश्वर कारखान्यावर काही दिवसापूर्वी ईडीने कारवाई केल्याने कारखाना अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण सातारा जिल्ह्यात जरंडेश्वर कारखाना सुरू करण्यासाठी आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रित करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले, जावली तालुक्यामध्ये सध्या दीड ते दोन लाख टन उसाचे उत्पादन आहे. प्रतापगड कारखाना बंद असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली असून ऊस उत्पादकांना इतरांच्या पुढे हात पसरण्याची वेळ आली आहे. यंदा तरी किसनवीर प्रतापगड सुरु होईल का याबाबत शंका आहे. सलग तीन हंगाम कारखाना बंद राहिल्याने ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. याचे किसन वीर प्रशासनाला सोयरसुतक वाटत नाही. किसनवीर कारखान्याला कारखाना चालवायला दिला म्हणून त्यांनी तीन वर्षे टाळा लावला हे आता कदापिही चालणार नाही, कामगारांचे पगार देखील दिले गेले नाहीत, कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम किसनवीर कारखाना प्रशासनाने केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत झाला आहे, त्यामुळे किसनवीर प्रशासनाने भाडेतत्वावर चालवण्यासाठी घेतलेला कारखाना हा प्रतापगड प्रशासनाला परत द्यावा, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा देखील शशिकांत शिंदे यांनी प्रशासनाला दिला आहे.