विधान परिषदेसाठी आज मतदान होणार आहे. सत्ताधारी भाजप, प्रमुख विरोधी पक्ष असलेले काँग्रेस व निजद या तिन्ही पक्षांना ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. किमान पंधरा जागांवर विजय मिळवून विधान परिषदेतील आपले संख्याबळ वाढविण्यासाठी भाजपने व्यूहरचना रचली आहे. 14 डिसेंबरला निकाल कोणाच्या बाजुने लागणार हे स्पष्ट होणार आहे.
गेल्या आठवडय़ात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तब्बल पाऊण तास उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीच्या सचित्र बातम्या प्रसिद्ध झाल्या. या भेटीनंतर भाजप-निजदची युती होणार अशी चर्चा सुरू झाली. या चर्चेला दोन्ही पक्षातील नेत्यांनी पूर्णविराम दिला आहे. तरीही देवेगौडा यांनी आपल्या विरोधकांना एक संदेशच पोहोचविला आहे. कर्नाटकात निजदचे अस्तित्व काँग्रेसला खटकते आहे. कारण निजदमुळेच काँग्रेसचे संख्याबळ कमी होते आहे, असा काँग्रेस नेत्यांचा समज आहे. म्हणून संधी मिळेल तेथे निजदला हाणायचे सत्र या नेत्यांनी अवलंबिले आहे.
निजदच्या वेगाला ब्रेक लावण्यासाठी शक्मय तितके खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निजद नेत्यांना काँग्रेसमध्ये ओढण्यात येत आहे. ज्या सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली या राजकीय खेळी सुरू आहेत, ते सिद्धरामय्या त्याच निजदच्या तालमीत तयार झालेले आहेत. याची सल देवेगौडा आणि कुमारस्वामी यांना आहेच. ज्या पक्षाने सिद्धरामय्या यांना राजकीयदृष्टय़ा जीवदान दिले, तोच पक्ष संपविण्यासाठी ते निघाले आहेत. कर्नाटकात अलीकडच्या वर्षात निजदला वगळून कोणत्याच पक्षाला राजकारण करता येत नाही, अशी स्थिती आहे. निवडणुकीत एकमेकांवर कितीही चिखलफेक केली तरी निवडणुकीनंतर सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना त्यांचा टेकू लागतोच. खरेतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेत्यांनी निजदला संपविण्याचे डाव खेळले आहेत. तरीही या दोन्ही पक्षांसोबत प्रसंगी कटुता बाजूला ठेवून घरोबा करण्याची तयारी निजद नेत्यांनी आजवर दाखविली आहे.
कर्नाटकात काँग्रेसबरोबर घटस्फोट घेत भाजपसोबत युतीचा प्रयोग कुमारस्वामी यांनीच केला. त्यावेळी या युतीला देवेगौडा यांचा विरोध होता. आता बदलत्या परिस्थितीनुसार देवेगौडा यांचे विचारही बदलले आहेत. आपले अस्तित्व टिकविण्यासाठी उतारवयातही त्यांची धडपड सुरूच आहे. या धडपडीचा एक भाग म्हणूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विरोधकांना संदेश दिला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजप-निजद युती होणार, अशी अटकळ होती. स्वतः देवेगौडा यांनी ‘आपण नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. कर्नाटकात कोणाच्या मागे रहायचे याचा निर्णय कुमारस्वामी जाहीर करतील’, असे सांगत भविष्यात युती होणार, याचे सूतोवाच केले होते. म्हणून राजकीय निरीक्षकांनाही युतीच्या घोषणेची प्रतीक्षा होती. मात्र, अत्यंत पद्धतशीरपणे कुमारस्वामी यांनी परिस्थिती हाताळली आहे. मतदानाला तीन दिवस शिल्लक असताना पत्रकार परिषद घेऊन कोणत्या मतदारसंघात कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय स्थानिक नेतेच घेतील, असे जाहीर करून अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे. या पवित्र्याने अनेक मतदारसंघात भाजपचाच फायदा होणार आहे, हे स्पष्ट आहे.
आगामी निवडणुकीत किमान 120 जागांवर विजय मिळवून निजदची सत्ता स्थापन करण्यासाठी आतापासूनच आपली तयारी सुरू आहे, असे कुमारस्वामी यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत कोणत्याच पक्षाबरोबर युती करणार नाही. कर्नाटकातील विधान परिषदेच्या 25 पैकी 6 जागांवर आपल्या पक्षाचे उमेदवार आहेत. जेथे जेथे आवश्यक संख्याबळ आहे तेथेच आम्ही आमचे उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. जेथे उमेदवार नाही त्या मतदारसंघात स्थानिक परिस्थिती पाहून आपल्या पक्षाचे नेते निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी जेथे उमेदवार नाही, त्या मतदारसंघात निजदने भाजपला मदत करावी, असे उघड आवाहन केले होते. एकीकडे येडियुराप्पा यांच्या या आवाहनामुळे युतीची शक्मयता दाट झालेली असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मात्र येडियुराप्पा यांना मदतीचे आवाहन केले आहे. याचा निर्णय कुमारस्वामी आणि येडियुराप्पा हे दोघेच घेतील, असे सांगत या घडामोडींशी आपला काही एक संबंध नाही, हे सुचविण्याचाच प्रयत्न केला आहे.
कर्नाटकात एक काळ असा होता, की कुमारस्वामी विश्वासघातकी आहेत, असे सांगत येडियुराप्पा यांनी भाजपची सत्ता आणली. आता त्याच विश्वासघातकी कुमारस्वामी यांना मदतीची साद घालताना निश्चितच यामागे योजकता असणार. विधान परिषदेत संख्याबळ वाढविण्यासाठी मुख्यमंत्री कमी पडत आहेत. त्यामुळे निजदने मदत करावी, असे आवाहन करीत मुख्यमंत्र्यांना कमकुवत ठरविण्याचा हा प्रयत्न असणार का, असाही संशय राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे. देवेगौडा यांनाही तूर्त भाजपशी युती करायची नसली तरी गरज पडली तर आम्ही पुन्हा भाजपबरोबर घरोबा करू शकतो, याचा संदेश काँग्रेस नेत्यांना द्यायचा होता. त्यांनी तो दिलेला आहे. मध्यंतरी निजद भाजपमध्ये विलीन होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. कुमारस्वामी यांनी या चर्चेला पूर्णविराम देत आम्ही आमचे अस्तित्व टिकवून ठेवणार, असे सांगत असले तरी गरज पडल्यास भाजपसोबत आपण आहोत, हे सुचविण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. म्हैसूर, मंडय़ा, हासनसह दक्षिणेत निजदचे वर्चस्व आहे. याच परिसरातील निजद नेत्यांना काँग्रेसमध्ये आणण्याचा सपाटा सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी चालविला आहे. त्याला शह देण्यासाठीच निजद नेत्यांनी भाजपशी मैत्रीची वावडी उठविली आहे. भाजपमध्येही सर्व काही ठिक आहे असे नाही. माजी केंद्रीयमंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी 10 डिसेंबरनंतर सरकारमध्ये मोठे फेरबदल होणार, असे सूतोवाच केले आहे. याचवेळी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी मुरगेश निराणी मुख्यमंत्री होणार, असे सांगितले आहे. यावरून बसवराज बोम्माई यांना पायउतार व्हावे लागणार का, असा संशय बळावला असला तरी सध्या तरी हायकमांड त्यांना बदलणार नाही, हे स्पष्ट आहे. बिटकॉईन घोटाळा, कंत्राटदारांनी केलेल्या 40 टक्के कमिशनचा आरोप अशा परिस्थितीत नेतृत्व बदल केला तर चुकीचा संदेश जाणार, याची जाणीव भाजप नेतृत्वालाही आहे.