काही गोष्टी अगदी भाग्यानं मिळतात आणि सध्याच्या भारतीय संघातील अभिजात गुणवत्ता हे देखील त्यापैकीच एक. कधी शिखर धवन बाहेर पडला तर केएल राहुल आत येतो, कधी हार्दिक पंडय़ा बाहेर पडला तर श्रेयस अय्यर आत येतो आणि कधी भुवनेश्वर बाहेर पडला तर नवदीप सैनी आत येतो. अव्वल दर्जाचा ‘बफर स्टॉक’ हाताशी असल्यामुळेच भारतीय संघ सध्या जागतिक स्तरावरील दिग्गज संघांना धूळ चारत आहे आणि न्यूझीलंड दौऱयात किवीज संघाचा टी-20 मालिकेत पाडलेला फडशा हे त्याचेच एक प्रतीक आहे.
जागतिक स्तरावरील तिन्ही क्रिकेट प्रकारात भारत सर्वात कमजोर, दुबळा कुठे असेल तर तो असतो टी-20 क्रिकेटमध्ये. सुरुवात मानांकनापासून करुयात. वनडेचे मानांकन घ्या, त्यात भारत अव्वल. कसोटीचे मानांकन घ्या, त्यातही भारतच अव्वल. पण, हीच स्थिती टी-20 क्रिकेटमध्ये अजिबात दिसून येत नाही. अर्थात, अव्वल सोडून द्या, भारत त्या मानांकन यादीत अगदी पहिल्या चारमध्येही दिसून येत नाही. तिथे भारत आहे चक्क पाचव्या स्थानी.
याचाच अर्थ असा की, भारताने जे साम्राज्य वनडे, कसोटी क्रिकेटमध्ये गाजवलेय, त्याची काकणभरही सर टी-20 क्रिकेटमध्ये आलेली नाही आणि ते ही जागतिक स्तरावरील सर्वात अव्वल टी-20 लीग भारतातच खेळवली जात असताना!
तसे पाहता, इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू पूर्ण तडफेने खेळत आले आहेत. पण, तीच तडफ टी-20 मध्ये दिसायची नाही, हे टी-20 मधील भारताचे मानांकन सांगायचे. पण, न्यूझीलंड दौऱयावर पोहोचल्यानंतर टी-20 क्रिकेट मालिका खेळताना अचानक भारतीय संघात न जाणो कोणता उत्साह संचारला आणि त्यांनी यजमान संघाला चक्क 3-0 अशा फरकाने धूळ चारत मालिकाविजयावरही शिक्कामोर्तब केले!
क्रिकेटच्या अनिश्चिततेचा महिमा असतो तो असा!
खरं तर भारताने यापूर्वी न्यूझीलंडचा दौरा केला, त्यावेळी वनडे मालिका जिंकली होती. पण, टी-20 क्रिकेट मालिकेने संघाचा घात केला होता. त्यामुळे, यंदा विराटसेना न्यूझीलंडमध्ये पोहोचली आणि कोणत्याही सराव सामन्यांशिवाय भारताला यजमानांविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची होती, त्यावेळी अनेक प्रश्नचिन्हे समोर असणे साहजिक होते. पण, भारताने वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये जे साम्राज्य गाजवलेय, त्याचा श्रीगणेशा या मालिकेच्या माध्यमातून केला आणि म्हणूनच आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हे सुचिन्हच मानायला हवे.
यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे आणि न्यूझीलंडप्रमाणेच ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ाही समसमान स्वभावधर्म दाखवणाऱया मानल्या जातात. याचमुळे, न्यूझीलंडमध्ये भारताने मिळवलेला मालिकाविजय अधिक आकर्षक भासतो.
सध्या न्यूझीलंड दौऱयात भारताने धमाकेदार टी-20 मालिकाविजय संपादन केला असला तरी नेमके याच क्रिकेट प्रकारात भारताची पीछेहाट का होते, हे अभ्यासण्यासारखे आहे. मुळात, सर्वात महत्त्वाची बाब अशी की, या छोटेखानी क्रिकेट प्रकारात केलेली चूक सावरण्यासाठी क्वचितच संधी मिळते. त्या तुलनेत वनडे व कसोटीमध्ये मात्र अधिक वेळ मिळतो आणि त्यात सावरता येते. टी-20 मध्ये तसे होऊ शकत नाही. कारण, मुळातच तेथे वेळ अतिशय कमी असतो आणि एखादी चूक दुरुस्त करेतोवर सामना हातातून निसटून गेलेला असतो.
कोण आहेत भारताचे टी-20 स्पेशालिस्ट?
याच पार्श्वभूमीवर, बहुतांशी संघाचे टी-20 स्पेशालिस्ट खेळाडू वेगळे असतात. भारत मात्र या स्पेशालिस्ट खेळाडूंच्या गटात मोडत नाही. कारण, ज्या चार-एक खेळाडूवर वनडे व कसोटीत भिस्त असते, त्याच चार-एक खेळाडूवर टी-20 मध्येही भिस्त ठेवली जाते. यामुळे, नाही म्हटले तरी अति क्रिकेटचा फटका हा बसतोच बसतो आणि ते न्यूझीलंड दौऱयात टी-20 मालिकाविजय संपादन करण्यापूर्वी भारताने उत्तमरित्या अनुभवले आहे.
कर्णधार विराटला त्याच्यासारखी तोडफोड फलंदाजी करु शकणारा फलंदाज हवा होता. हार्दिक पंडय़ा यात 50 टक्के चपखल बसत होता. पण, तो तंदुरुस्त नाही. त्यानंतर विराटने ऋषभ पंतवर जुगार खेळला. पण, तो सातत्याने संघावरच उलटत राहिला. जितक्या संधी मिळतील, तितके ऋषभ पंतने त्याची माती केली. त्या तुलनेत शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, श्रेयस अय्यरसारखे खेळाडू जी संधी मिळाली, त्याचे अधिक चीज करु शकले आहेत.
मुळात, वनडे व कसोटीच्या तुलनेत टी-20 मध्ये चुका दुरुस्त करण्याची अजिबात संधी मिळत नाही, हे येथे लक्षात घ्यायला हवे.
भारतातच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विंडीजने आपल्याला ज्याप्रकारे धूळ चारली, ते उदाहरण येथे समर्पक ठरते. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्या लढतीत कागदावरील संघ पाहता विंडीजच्या तुलनेत भारतच सरस होता.
विराट कोहलीच्या 47 चेंडूतील 89 धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने निर्धारित 20 षटकात केवळ 2 गडय़ांच्या बदल्यातच 192 धावांची आतषबाजी केली. प्रत्युत्तरात ख्रिस गेल (5), मॅरलॉन सॅम्युएल्स (8) स्वस्तात बाद झाल्याने भारताच्या आशाअपेक्षा दृढ झाल्या होत्या. पण, याचवेळी लेंडल सिमॉन्स नावाचे वादळ वानखेडे स्टेडियमवर अवतरले आणि पाहता पाहता भारतीय संघ पराभूत झाला आणि विश्वचषकातील आव्हानही संपुष्टात आले. आंद्रे रसेलनेही 20 चेंडूत जलद 43 धावा फटकावल्या होत्या. पण, भारतासाठी लेंडल सिमॉन्स हाच त्यातील खरा कर्दनकाळ ठरला.
अपयशातून धडे शिका
भारताने अशा अपयशातून धडे शिकायला हवेत. ऑस्ट्रेलियातील मैदाने तुलनेने अधिक मोठी असतात. त्यामुळे, तेथे नेहमीच्या धाटणीने फलंदाजी करुन नाही चालत. भारतातील स्टेडियमवर जे षटकार असतात, ते ऑस्ट्रेलियातील मैदानावर झेलात रुपांतरित केले जाऊ शकतात. त्यामुळे, अर्थातच, तेथे अधिक दक्ष रहावे लागेल. पण, भारताचा सध्याचा फॉर्म व मुख्य खेळाडूंचा बहर यामुळे अर्थातच आशाअपेक्षा निश्चितच उंचावलेल्या असणार आहेत.
कारण, प्रेक्षकच खरे खेळाचे मायबाप!
भारताने न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिकाविजय संपादन केला, तो अर्थातच महत्त्वाचा आहे. कारण, ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱया टी-20 विश्वचषकाचा मार्ग याच मजल-दरमजल प्रवासातून जातो. अर्थात, यापूर्वीही बहरात असताना, जेतेपदासाठी फेवरीट मानले जात असताना अपयशाचे जबरदस्त धक्के भारताला सोसावे लागले आहेत, त्यापासून योग्य ते धडे घ्यायला हवेत.
कारण, प्रेक्षक या खेळाचे खरेखुरे मायबाप आहेत. ते ज्याप्रमाणे संघ जिंकल्यानंतर खेळाडूंना डोक्यावर घेऊन नाचण्यात मागेपुढे पहात नाहीत, त्याचप्रमाणे प्रसंगी अपयश आले तर खेळाडूंच्या प्रतिमेचे दहन करण्यातही मागे रहात नाहीत.
अगर ‘कसमे’ सच्ची होती तो सबसे पहले ‘खुदा’ मरता, हे भारतीय संघाने लक्षात ठेवायला हवे आणि त्यानुसार टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने जडणघडण करायला हवी.
विवेक कुलकर्णी