प्रा. माधुरी शानभाग यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
लेखनाचे बीज फुलण्यासाठी आवश्यक स्पंदनांची वाटचाल, कष्ट आणि सातत्य यांच्या जारोवर होते. प्रत्येकामध्ये लेखनाची प्रतिभा असेलच असे नाही मात्र उर्मी असणे आवश्यक आहे. लेखन ही सृजनशील व कष्टसाध्य कला आहे. यामुळे भाषिक कौशल्यांच्या माध्यमातून झालेली मनाची मशागत लेखनासाठी मार्गदर्शक ठरते. साहित्यावरील पेम व वाचनाचा संस्कार लेखनासाठी प्रोत्साहन देतो. आयुष्य एक कांदबरी आहे, असे समजून भाषिक कौशल्याच्या जोरावर व्यक्त होण्यासाठी लेखनाचे मर्म जाणून घेतले पाहिजे, असे मत प्रा. माधुरी शानभाग यांनी व्यक्त केले.
मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे आयोजित 33 व्या मंथन साहित्य संमेलनात प्रा. माधुरी शानभाग अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. रविवारी हिंदवाडी येथील वरेरकर नाटय़ गृहात मंथन संमेलन पार पडले. पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्षा प्रा. माधुरी शानभाग, प्रा. कुंदाताई बेळगावकर, मंथन सोसायटीच्या अध्यक्षा संपदा जोशी, हिंदवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुमती कुदळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्षा सुनिता पाटणकर, राही कुलकर्णी, मौसमी भातकांडे उपस्थित होत्या. प्रारंभी संपदा जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. माधुरी शानभाग पुढे म्हणाल्या, लेखनाला वयाची मर्यादा नाही. यासाठी सजग वाचक असणे आवश्यक आहे. श्रवण, वाचन, भाषण या कौशल्याच्या माध्यमातून पुढे लेखन विस्तार वाढतो. संवाद लेखन, शब्दांकन, मुलाखत लेखन, वाचकांची पत्रे, ग्रंथपरीक्षण, लेख संपादन, स्मरणिका संपादन अशी लेखनाची विविध माध्यमे उपलब्ध आहेत.
यावेळी संमेलनानिमित्त घेतलेल्या कथाकथन स्पर्धा, काव्य लेखन (पोवडा) स्पर्धा, प्रवास वर्णन लेखन स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. प्रारंभी चंद्रज्योती देसाई यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचा परिचय अपर्णा देशपांडे यांनी करून दिला. संमेलनात रांगोळी रेखाटन केलेल्या प्रिया फडके व पूजा फडके या भगिनींचे अभिनंदन करण्यात आले. प्रथम सत्राचे सूत्रसंचालन सुरेखा भावे यांनी केले. तर नीना जठार यांनी आभार मानले.
‘वाटेवरच्या लाटा’पुस्तकाचे प्रकाशन
पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्षा प्रा. माधुरी शानभाग यांच्या ‘वाटेवरच्या लाटा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. प्रा. कुंदा बेळगावकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. कुंदा बेळगावकर यांनी विज्ञान आणि कला साहित्याचे मिश्रण म्हणजे प्रा. माधुरी शानभाग आहेत. वाटेवरच्या लाटा हे पुस्तक प्रवासवर्णन नाही तर लेखिकाच्या मनातील तरंग आहेत. अनेक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविणारे एकमेकांशी नाते जुळवणारे लेखन अनुभवयाला मिळते. आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यावा आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा याचा अनुभव म्हणजे वाटेवरच्या लाटा हे पुस्तक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दुसऱया सत्रात परिवर्तनाविषयी विचारमंथन
संमेलनाच्या दुसऱया सत्रात परिवर्तन या विषयावर चर्चासत्र पार पडले. कवी अविनाश ओगले यांच्या ‘काजवा’ कवितेतून परिवर्तन हा विषय निवडण्यात आला होता. या सत्रात किशोर काकडे यांनी सामाजिक भान तर प्रा. अनिरुद्ध ठुसे यांनी शिक्षणाकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन याविषयावर वास्तववादी भाष्य केले.
प्रारंभी संमेलनाध्यक्षा प्रा. माधुरी शानभाग यांच्या हस्ते वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर सत्राचे सूत्रसंचालन शोभा लोकूर यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमातून मनोरंजन
संमेलनाच्या पहिल्या दोन सत्रात वैचारिक मंथन, बौद्धिक आनंद देणारे व्याख्यान पार पडले. तर संमेलनाच्या तिसऱया सत्रात मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रमाचा अनुभव रसिक श्रोत्यांना घेता आला. तेजस्विनी सोमसळे यांनी भावबंधन हा नाटय़विष्कार सादर केला तर योगिता हुच्चनट्टी यांनी चारचौघी हा नाटय़विष्कार सादर केला. यानंतर ज्ये÷ सदस्या रागिणी गाडगीळ यांनी कविता सादर केली.
यानंतर शब्दांची सुंदर रचना आणि भावनांचे काव्यातून उमटलेले प्रतिबिंब अर्थात कवितांचे सादरीकरण करण्यात आले. तिसऱया सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन पार पडले. प्रा. अशोक अलगोंडी यांच्या निवेदनातून तर कवियत्रिंच्या विविध विषयावरील काव्यातून संमेलन काव्यमय बनले. रेखा गदे, सिंधुताई जोशी यांनी स्वरचित कवितेचे सादरीकरण केले. तसेच रोशनी हुंदरे यांनी दिवा व अजून यौवनात मी, मनीषा नाडगौडा यांनी महती माहेराची, हुरहुर सांजवेळी, विजया उरणकर यांनी विठ्ठलाची वारी, अस्मिता अळतेकर यांनी सय माहेराची, स्वागत नववर्षाचे, प्रा. अशोक अलगोंडी यांनी कविता भेटते, उपेक्षित बाप या कविता सादर केल्या.
यानंतर कथाकथनाचे सत्र पार पडले. संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या कथांचे सादरीकरण करण्यात आले. शंकर पाटील लिखित रामायणाचे महाभारत ही विनोदी कथा संजीवनी खंडागळे यांनी सादर केली. तर अर्चना ताम्हणकर यांनी द. मा. मिराजदार लिखित बापाची पेंड ही कथा सादर केली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी सर्व कलाकारांचा अध्यक्षा संपदा जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर सत्राचे सूत्रसंचालन संजना सामंत यांनी केले.