ऑनलाईन टीम / पुणे :
‘अभिनयात गुरु परंपरा नाही, पण, प्रत्येकाकडून मी शिकत गेलो, प्रत्येका कडून घेत गेलो, आज जे यश मिळाले ते मला नसून त्या सर्व पूर्वसुरींना , बालगंधर्वांसारख्या महान व्यक्तीमत्वांना आहे, असे समजून अर्पण करीत असतो, ‘ असे भावूक मनोगत अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केले.
निमित्त होते बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या प्रकट मुलाखतीचे ! ‘दकनी अदब फाऊंडेशन’ आयोजित डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल मध्ये दुसऱ्या दिवशी , शनीवारी सायंकाळी अभिनेते सुबोध भावे यांची प्रकट मुलाखत मिलिंद कुलकर्णी यांनी घेतली.
डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलमधील या मुलाखतीतून जणू अभिनयातला ‘ सुबोध भावे प्रयोग ‘ उलगडला. मिलिंद कुलकर्णी यांनी सुबोध भावे यांच्याशी संवाद साधला.
कोणाला गुरु मानतोस या प्रश्नावर सुबोध म्हणाला, ‘ अभिनयात गुरु परंपरा नाही, पण, प्रत्येकाकडून मी शिकत गेलो. घेत गेलो. जणू, चोरत गेलो. वाचनातून शिकत गेलो.
बालगंधर्व यांच्या बद्दल वाचायच्या आधी नाट्यसंगीताबद्दल गैरसमज होते. शौनक, राहुल अशा मित्रांमुळे संगीत कळत गेले. याच बालगंधर्व रंगमंदिरात विंगेत मी उभा राहत असे. पण, बालगंधर्व यांच्या बद्दल वाचले नव्हते. शरम वाटून मी त्यांच्या बद्दल आणखी वाचून काढले. अपार आदर त्यामुळे निर्माण झाला.
‘पुरुष साडी का नेसतात ‘ हा प्रश्न मला असायचा . साडी नेसणं, वावरणं ही अवघड गोष्ट आहे.बालगंधर्व यांनी साकारलेल्या स्त्री भूमिका सत्व युक्त व्हाव्यात, सौंदर्य युक्त, शालीन व्हाव्यात याची काळजी घेतली. हल्ली स्त्री भूमिका डोक्यात जातात, बीभत्स वाटतात.
बालगंधर्व साकारताना त्या भूमिकेत गेलो, विक्रम गायकवाड यांनी बालगंधर्व यांच्या काळातील नैसर्गिक रंग वापरले.पंधरा किलोची साडी नेसायला सव्वा तास लागत असे. या मेहनतीनंतर जी स्त्री आरशात दिसली, तिच्या प्रेमातच पडायला झाले. बाईपणाचं उसनं अवसान आणता आणता मी बाई झालो, आणि यश मिळाले.