नवारस्ता / प्रतिनिधी
राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घडणाऱ्या घटनांना आळा बसून महिलांना सुरक्षितता मिळावी यासाठी राज्यशासन लवकरच प्रत्येक जिल्ह्यात एका महिला पोलीस ठाण्याची स्थापना करणार असल्याची घोषणा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी केली. पाटण तालुक्यातील मरळी (दौलतनगर) येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान ‘चुल आणि मुल ‘ या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिलांनी बाहेर येवून विविध क्षेत्रामध्ये आपली चमक दाखवून आपली प्रगती साधावी, असे आवाहनही मंत्री देसाई यांनी केले.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना पाहून मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्हयात सर्व अधिकारी व कर्मचारी महिला असणाऱ्या किमान एक महिला पोलीस ठाण्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असून नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये विधानपरीषदेमध्ये याची घोषणा देखील केल्याचे सांगून मंत्री देसाई यांनी उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सामाजीक कार्यकर्त्या श्रीमती राणी पाटील यांनी “चला नाती जपुया” व पाटण तालुका महिला सरपंच परीषदेच्या अध्यक्षा सौ.वैशाली मोकाशी “महिला व्यवसाय उभारणी व बचत गट” या विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी राज्य शासनाच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीचे सादरीकरणही याठिकाणी करण्यात आले. मेळाव्याचे आयोजन पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,ग्रामपंचायत मरळी,मरळी विकास सेवा सोसायटी,ज्योतिर्लिंग दुध संघ,शंभूराज युवा संघटना मरळी यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी मारुलहवेली जिल्हा परीषद गटाच्या जि.प.सदस्या सौ.सुग्रा खोंदू,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,पाटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.मीना साळुंखे,जि.प.सदस्य विजय पवार,माजी सदस्य जालंदर पाटील, सामाजीक कार्यकर्त्या श्रीमती राणी पाटील,पाटण तालुका महिला सरपंच परीषदेच्या अध्यक्षा सौ.वैशाली मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती होती.