काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या स्वतःच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत काबूलमधून दररोज 2 विमानोड्डाणांना संचालित करणार आहे. अमेरिका आणि नाटो फोर्सने याकरता अनुमती दिली आहे. लवकरच सर्व भारतीयांना परत आणले जाईल. तेथे अद्याप 300 भारतीय अडकून पडल्याची माहिती असल्याचे विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार जेक सुलिवन यांच्यासोबत यासंबंधी चर्चा केली होती. त्यानंतरच भारताला ही अनुमती मिळाली आहे. भारत आतापर्यंत ताजिकिस्तानच्या दुशाम्बे आणि कतारमार्गे स्वतःच्या नागरिकांना एअरलिफ्ट करत आहे.
या निर्णयानंतर भारत पहिल्यांदाच काबूल विमानतळावरून स्वतःच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी विमानोड्डाणांचे संचालन करत आहे. 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानच्या कब्जानंतर हामिद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या अमेरिकेच्या सैन्याचे नियंत्रण आहे. अमेरिकेचे सैन्य सध्या स्वतःचे नागरिक, शस्त्रास्त्रs आणि उपकरणांना बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. राजधानी काबूलमधील स्वतःचा दूतावास रिकामी केलेला भारत आता स्थानिक कॉन्ट्रक्टर्सच्या मदतीने अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न करत आहे.
तालिबानने शनिवारी 70 अफगाण शीख आणि हिंदूंच्या तुकडीला भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) विमानात चढण्यापासून रोखले. काबूल विमानतळावरून त्यांना परत पाठवण्यात आले. त्यात अफगाणिस्तानच्या संसदेच्या दोन अल्पसंख्याक सदस्यांचाही समावेश आहे. तुम्ही अफगाणिस्तानचे नागरिक असल्याने देश सोडू शकत नाही, असा इशारा तालिबानने त्यांना दिला आहे. तत्पूर्वी दिवसभर सदर भारतीयांचे अपहरण झाल्याची चर्चा होती. मात्र, तालिबानने अपहरणाचा इन्कार केला आहे. सर्व भारतीय सुरक्षित असून त्यांचा पासपोर्ट तपासल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे.
अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदूंची पहिली तुकडी भारतात परतण्यासाठी शुक्रवारपासून 12 तासांहून अधिक काळ विमानतळाबाहेर थांबली होती. या जवळपास दीडशे जणांमध्ये अल्पसंख्याक खासदार नरिंदर सिंग खालसा आणि अनारकली कौर मनोयर यांचाही समावेश होता. याचदरम्यान तालिबानींनी त्यांना आयएएफच्या विमानात चढण्यापासून रोखले. त्यानंतर त्यांच्या नागरिकत्व कागदपत्रांची आणि पासपोर्टची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर सर्वांना काबूलमधील गुरुद्वारामध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती वर्ल्ड पंजाबी ऑर्गनायझेशनचे (डब्ल्यूपीओ) अध्यक्ष विक्रमजीत सिंह साहनी यांनी दिली.
भारताचे जोरदार प्रयत्न
अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर तालिबानने कब्जा केल्यापासून राजधानी काबूलच्या विमानतळावर गोंधळाचे वातावरण आहे. अमेरिका आणि भारतासह सर्व देश आपापल्या नागरिकांना मायदेशी नेण्यात व्यग्र आहेत. दरम्यान, भारतीय हवाई दलाचे सी-130जे हे विमान 85 भारतीयांना घेऊन काबूलहून निघाल्याच्या वावडय़ाही पसरल्या होत्या. तथापि, शनिवारी दिवसभरात एकाही भारतीय विमानाने काबूलमधून उड्डाण केले नसल्याचे अधिकृत वृत्त आहे. तालिबान शहर ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना भारताने यापूर्वी कंधारमधील आपल्या दुतावास कर्मचाऱयांना सुरक्षित बाहेर काढले होते. तसेच एअर इंडियाच्या विमानाने काही लोकांनाही काबूलहून भारतात आणले होते.
अपहरणाची चर्चा, तपासणीचा दावा
अफगाणिस्तानात काबूल विमानतळावर दीडशे भारतीयांना तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याचे धक्कादायक वृत्त शनिवारी सकाळपासून सर्वत्र पसरले होते. मात्र, दुपारनंतर दीडशे भारतीयांना ताबिलान्यांनी सोडल्याची माहिती समोर आली. अपहरणाच्या वृत्तानंतर तालिबान्यांनी हे वृत्त फेटाळले. आम्ही भारतीयांचे अपहरण केले नसून त्यांना सुरक्षित स्थळी नेल्याचा दावा तालिबान्यांच्या प्रवक्त्यांनी केला होता. तसेच अपहरण केल्याचे वृत्त तालिबान्यांनी फेटाळले होते. तालिबानी प्रवक्ता अहमद्दुल्ला वसीक यांनी हे वृत्त निराधार असून तालिबान अशी कृती कधीच करणार नाही, असे ते म्हणाले.
भारतीय सुरक्षित ः प्रसारमाध्यमांची स्पष्टोक्ती
अफगाणिस्तानच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनीही सर्व भारतीय सुरक्षित असून पासपोर्ट पडताळणीनंतर त्यांना सोडून देण्यात आल्याचे जाहीर केले होते. तालिबानने 150 पेक्षा अधिक लोकांना आलोकोजई येथे नेले होते. या दीडशे जणांमध्ये सर्वाधिक भारतीय नागरिकांचा समावेश होता. तसेच यामध्ये काही अफगाणी नागरिक आणि अफगाणी शीखदेखील होते.
भितीदायक परिस्थिती कायम
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी सत्ता मिळवल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर आणि भितीदायक झाली आहे. 20 वर्षांपूर्वीची भीतीची परिस्थिती पुन्हा दिसू लागली आहे. तालिबान्यांच्या दहशतीमुळे अनेकांवर देश सोडून जाण्याची वेळ आली आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना आपल्या देशात आणण्याचे मिशन सुरु आहे. 15 ऑगस्टपूर्वीच ऑपरेशन एअरलिफ्टची तयारी सुरु झाली असून भारतीय यंत्रणा आताही सर्व परिस्थितीवर नजर ठेवून आहे. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्यापूर्वीच परिस्थिती पाहून, भारत सरकार तेथून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे.
अशरफ गनींचा बंधू तालिबानींच्या कंपूत
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडून परांगदा झाले आहेत. यातच आता त्यांचे भाऊ हशमत गनी अहमदजई तालिबानी गटाच्या कंपूत सहभागी झाले आहेत. हशमत गनी हे तालिबानमध्ये दाखल झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. अल्हाज खलील-उर-रहमान हक्कानी याच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी तालिबानला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीनंतर त्यांनी आपण तालिबानच्या पाठीशी असल्याची घोषणा केली आहे.