प्रतिनिधी / कोल्हापूर
देशामध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना आणण्यासाठी तसेच महाराष्ट्रात अडकलेल्या नागरिकांना परराज्यात पाठविण्यासाठी देशातील प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफीसरची नेमणूक करावी, अशी मागणी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदनाव्दारे केली.
या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्यातंर्गत नागरिक वाहतूक करण्यासाठी यंत्रणा योग्यरितीने कार्यरत असल्याचे दिसून येते. परंतु परराज्यातून महाराष्ट्रात येऊ इच्छिणाऱ्या आपल्या राज्यातील नागरिकांना संपर्क साधण्यासाठी कार्यान्वित केलेली तीन अधिकाऱ्यांची रचना सदर नागरिकांना अजून समजून येत नाही.
आपल्या देशातील मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड, गुजरात, जम्मू – काश्मीर व लडाख यांनी आपल्या नागरिकांना इतर राज्यातून आपल्या राज्यात येण्यासाठी त्या-त्या राज्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफीसर नेमलेला आहे. सदरचे नागरिक व विद्यार्थी ज्या राज्यातून येणार आहेत तेथे त्यांना प्रथम अर्ज करावा लागतो व त्या परवानगी नंतरच त्यांना आपल्या राज्यात येता येते. यासाठी त्या-त्या राज्यासाठी नेमलेल्या स्वतंत्र नोडल ऑफीसरच्या सहकार्याने सदरची परवानगी मिळवणे त्या-त्या नागरिकांना सोयीचे होते. यापद्धतीमुळे संबंधित नागरिक व त्याने ज्या राज्यातून येणेसाठी अर्ज केलेला आहे तो अधिकारी यांच्यात समन्वय साधण्यास मदत होते.
या व्यवस्थेमुळे महाराष्ट्रात परराज्यातून येणाऱ्या आपल्या राज्यातील नागरिकांची सोय होणार आहे.