काही ठिकाणी मतदानयंत्रांमध्ये बिघाड, प्रक्रिया शांततेत पूर्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा प्रथम टप्पा पूर्ण झाला आहे. त्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील 11 जिल्हय़ांमधील 58 मतदारसंघांचा समावेश होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार या टप्प्यात प्राथमिक अनुमानानुसार 60.57 टक्के मतदान झाले आहे. अंतिम टक्केवारी शुक्रवारी घोषित होण्याची शक्यता आहे. एकंदर, मतदानात उत्साह दिसून आला.
मतदानाला सकाळी 7 वाजता प्रारंभ झाला. संध्याकाळी 6 वाजता मतदानाचा अधिकृत समय संपला तेव्हाही अनेक मतदानकेंद्रांसमोर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सहानंतरही मतदान चालले. या टप्प्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील 9 मंत्र्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. भारतीय जनता पक्ष, सप आणि रालोदसाठी हा टप्पा अत्यंत महत्वाचा आहे.
या टप्प्यात 25 हजारांहून अधिक मतदानकेंद्रे स्थापन करण्यात आली होती. 1 लाखांहून अधिक सुरक्षा सैनिक नियुक्त करण्यात आले होते. तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 800 तुकडय़ा नियुक्त करण्यात आल्या होत्या. काही मतदानकेंद्रांमध्ये मतदानयंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे काही काळ मतदान प्रक्रियेत खंड पडला होता. मात्र, यंत्रे त्वरित बदलण्यात आल्याने मतदान सुरळीत झाले.
भाजपचा विश्वास
या टप्प्यात भाजपला मागच्या निवडणुकीत मिळाले तसेच यश मिळेल असा विश्वास अनेक भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. मतदान जोमाने झाल्याने भाजपच्या विजयाची शक्यता वाढल्याचे काही तज्ञांनीही सूचित केले आहे. मात्र, अंतिम चित्र 10 मार्चला मतगणनेदिवशीच स्पष्ट होणार आहे.
चौधरींचे मतदान नाही
राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांनी या निवडणुकीत मतदान न केल्याने त्यांच्यावर सोशल मीडियामधून टीकेचा भडिमार झाला. आपण संध्याकाळी मथुरा येथे आपल्या मतदारसंघात येण्याचा प्रयत्न करु असा संदेश त्यांनी प्रथम दिला होता. तथापि, मतदानाची वेळ संपल्यानंतरही ते आले नाहीत.
मागच्या वेळेइतकेच मतदान
2017 च्या विधानसभा निवडणुकीत या टप्प्यात 63.68 टक्के मतदान झाले होते. यावेळीही तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त मतदान झालेले आहे. मतदानाची अंतिम टक्केवारी घोषित झाल्यानंतर नेमका आकडा कळू शकणार आहे. सकाळी मोठी थंडी असूनही मतदारांनी मतदानाचे पवित्र कर्तव्य उत्साहात पार पाडले आहे.