शिक्षणाच्या क्षेत्रात प्रभावी कार्य – दुर्बल वर्गातील मुलांपर्यंत पोहोचविले गुणवत्तापूर्ण शिक्षण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रथम या स्वयंसेवी संस्थेला 2021 साठीचा ‘इंदिरा गांधी शांतता, निशस्त्राrकरण आणि विकास पुरस्कार’ देण्यात येणार आहे. भारत तसेच जगभरातील वंचित गटातील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टने याची माहिती दिली आहे.
पुरस्कारविजेत्याची निवड माजी सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील एका आंतरराष्ट्रीय ज्युरीने केली आहे. 25 वर्षांहून अधिक काळापर्यंत शिक्षणाच्या क्षेत्रात प्रभावी काम करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतोय. स्वयंसेवी संस्थेने प्रत्येक मुलापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे ट्रस्टकडून म्हटले गेले.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर
प्रथमने शिक्षण प्रदान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला. शिक्षणाच्या गुणवत्तेचे नियमित मूल्यांन केले. प्रथमने कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असतानाही मुलांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचेल या दृष्टीने प्रयत्न केल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले. या पुरस्कारादाखल 25 लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते.
प्रथमने मानले आभार
स्वयंसेवी संस्थेने या पुरस्कारासाठी स्वतःचे समर्थक आणि ज्युरींचे आभार मानले आहेत. डॉ. माधव चव्हाण आणि फरीदा लांबे यांनी 1995 मध्ये या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेने मुंबईतील झोपडपट्टय़ांमधून स्वतःचे काम सुरू केले होते. तेथे त्यांनी समुदाय आधारित बालवाडी स्थापन केल्या होत्या.