बेळगाव/प्रतिनिधी
चैत्र पौर्णिमेला म्हणजेच दवण्याला वाडी रत्नागिरी येथे नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थानच्यावतीने पदयात्रा काढण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत यंदाची पदयात्रा काढण्यात आली नाही. त्यामुळे वर्षाची पायी वारी न चुकविता गुढीपाडव्याच्या आधी येथील ज्योतिर्लिंग देवस्थानच्यावतीने प्रथा खंडित होऊ न देता परंपरा जपली आहे.
शनिवार दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता येथील मंदिरातील भक्त मंडळींनी वाडी रत्नागिरीकडे प्रस्थान केले. त्यावेळी परंपरेनुसार पंचगंगा नदीत स्नान करून नैवेद्य दाखविण्यात आला. गायमुख येथे देवाला अभिषेक व शिवलिंगाचे पूजन करून गायमुख येथे एक दिवस वास्तव्य करण्यात आले.
दुसऱया दिवशी सकाळी गायमुखापासून वाजत-गाजत जोतिबा देवाची मूर्ती दक्षिणद्वाराकडून गाभाऱयात नेण्यात आली. सूरज उपाध्ये गुरुजी व गावातील नागरिकांच्यावतीने देवाची आरती करण्यात आली. त्यानंतर गाभाऱयात जोतिबा देवाची भेट घेऊन पालखी खेळवून, नैवेद्य दाखवून मंदिरातील सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आले. यावेळी जगावर असलेले कोरोनाचे संकट लवकर टळू दे, अशी प्रार्थना करण्यात आली. यमाई देवीचे दर्शन घेऊन सायंकाळी 5.30 वाजता पालखी बेळगावकडे मार्गस्थ झाली. त्यानंतर 27 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता पालखी गोंधळी गल्ली येथील वेताळ देवस्थानकडून वाजत-गाजत नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानमध्ये आली. या मिरवणुकीत भांदुर गल्लीतील संदीप चौगुले यांच्या बैलगाडीचा सहभाग होता.