आधुनिक जगात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे रोग माणसाच्या आयुमर्यादेवर विपरीत परिणाम करीत आहेत. त्यापैकी वाढते प्रदूषण हे एक मोठे कारण आहे.
- अमेरिकेतील शिकागो येथील तज्ञांनी केलेल्या जागतिक पाहणीत सर्वसामान्य भारतीयांचे आयुष्य प्रदूषणामुळे 5.2 वर्षांनी कमी होत असल्याचा निष्कर्ष सखोल अभ्यासानंतर नोंदवला आहे.
- आशियाई खंडात बांगलादेश, सिंगापूर, नेपाळ आणि पाकिस्तान यांच्या तुलनेत भारताचे प्रदूषण अधिक असून क्रमवारीत जगामध्ये आपला दुसरा क्रमांक लागतो.1998 मध्ये प्रदूषणामुळे साधारणतः 3.4 वर्षे आयुष्य घटत होते. आज त्यात वाढ झाल्यामुळे चिंता व्यक्त होणे स्वाभाविक आहे.
- लखनौमध्ये तर प्रदूषणाची पातळी इतकी वर गेली आहे की तिथे हे सरासरी आयुष्य 10.3 वर्षांनी कमी झाले आहे.
- दिल्लीत अशीच भयावह स्थिती असून राजधानीत सर्वसामान्य जीवन प्रदूषणामुळे 9.4 वर्षांनी कमी होताना दिसत आहे. या पाहणीला जागतिक आरोग्य संघटनेचा दुजोरा आहे.
- तुलनेने चीन आणि सिंगापूर यांनी प्रदूषणाच्या पातळ्या लक्षणीय प्रमाणात कमी आणल्या. सातव्या क्रमांकावर असलेल्या चीनने प्रदूषणविरोधी सूत्रबद्ध आणि कडक कार्यक्रम राबवून प्रदूषण 40 टक्के कमी केले.
- आज चीनची आयुष्यरेखा 1.3 वर्षांनी वाढली आहे. ज्या इटलीमध्ये कोरोनाने मृत्यूचे तांडव घातले तिथे उत्तरेत मृत्यूचे प्रमाण 12 टक्के होते तर देशाच्या दक्षिणेला हेच प्रमाण प्रदूषण कमी असल्यामुळे साडेचार टक्क्यांवर थांबले होते.
- 2003 च्या सार्सच्या वेळीसुद्धा मृत्यूचा थेट संबंध दिसला होता. कोरोना हा एकटाच मानवजातीला संपवण्यासाठी निर्माण झालेला नाही, त्याला मानवानेच निर्माण केलेला प्रदूषणाचा भस्मासुर साथ देत आहे.
- म्हणूनच निसर्गाच्या सान्निध्यात जास्तीत जास्त काळ राहणे आणि प्रदूषणामुळे होणारे परिणाम कमी करण्यासाठी नियमित योगा, व्यायाम करणे आवश्यक बनले आहे.