आदेशानंतर त्वरित दिल्लीतील सर्व शाळा बंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील प्रदूषण समस्येवर चोवीस तासांमध्ये निर्णय घ्या, अन्यथा आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल, असा सज्जड इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे दिल्ली सरकारने सर्व शाळा बंद ठेवण्याचा आदेश लागू केला आहे. पुढील आदेशापर्यंत शाळा बंदच राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारलाही, दिल्लीतील प्रदूषण कमी का होत नाही ? असा थेट प्रश्न केला आहे.
दिल्ली सरकारने कर्मचाऱयांना घरातून काम करण्याची मुभा प्रदूषणामुळे दिली आहे. मग विद्यार्थ्यांनाच शाळेत येण्याची सक्ती का, असा प्रश्न सरन्यायाधीश रामण्णा यांनी दिल्लीच्या राज्य सरकारला विचारला. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात शाळा बंद केल्या आहेत, असे नमूद केले होते. तथापि, तसे झालेले नाही. तेव्हा येत्या 24 तासांमध्ये निर्णय घेतला नाही तर सर्वोच्च न्यायालयाला कृतीदलाची स्थापना करावी लागेल, असे खडसावताच दिल्ली सरकारने त्वरित कृती केली. दिल्ली सरकारने प्रदूषणाच्या समस्येवर जनजागृती करण्यासाठी युवक पुढे येत आहेत, असे आपल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले होते. मात्र रस्त्यावर उभे राहून हे युवक जे करीत आहेत, तो आपल्या प्रचाराचा भाग आहे का, असा प्रश्न न्यायालयाने दिल्ली सरकारला विचारला. या युवकांचे प्रदूषणापासून संरक्षण करण्याची काय सोय आहे, अशीही पृच्छा न्यायालयाने केली. त्यानंतर दिल्ली सरकारने त्वरित शाळा बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.