उत्तर प्रदेशच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दावा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पाकिस्तानातील वातावरण प्रदूषित असल्याने व उत्तर भारतात वाऱयाबरोबर हे प्रदूषण पसरत असल्याने दिल्लीला प्रदूषणाला तोंड द्यावे लागते, असे प्रतिपादन उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी करण्यात आले आहे. दिल्लीच्या प्रदूषणात उत्तर प्रदेशचा कोणताही सहभाग नाही. पाकिस्तानातील प्रदूषित हवा दिल्लीत आल्याने प्रदूषण पसरते, अशी भूमिका मांडण्यात आली.
उत्तर प्रदेशात जे उद्योग आहेत, त्यांपासून दिल्लीत प्रदूषण होत नाही. कारण वाऱयाची दिशा उत्तर प्रदेशपासून दिल्लीकडे नाही, तर दिल्लीपासून उत्तर प्रदेशकडे आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण अनेकदा उत्तर प्रदेशात पसरते. दिल्लीत ही प्रदूषित हवा पाकिस्तानमधून येते. त्याला उत्तर प्रदेश काही करु शकत नाही. उलट आठ तासांच्या निर्बंधांमुळे उत्तर प्रदेशातील दूध आणि ऊस उत्पादनावर परिणाम होत आहे, असा युक्तीवाद प्रसिद्ध वकील रणजीत कुमार यांनी केला.
यावर सरन्यायाधीश रामण्णा यांनी, आपण पाकिस्तानातील उद्योग बंद करु इच्छित आहात का, असा प्रतिप्रश्न केला. यावर कुमार यांनी आपण दिल्लीतील प्रदूषणाचे शास्त्रीय कारण स्पष्ट करत आहोत, असे उत्तर दिले.
दिल्लीत शुक्रवारपासून शाळा बंद
दिल्लीत शुक्रवारपासून सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तसा आदेश बुधवारी दिला होता. तो लागू करण्यात आल्याचे दिल्ली सरकारने स्पष्ट केले. त्या पुन्हा केव्हा सुरु केल्या जातील या विषयी माहिती देण्यात आली नाही. कदाचित त्या 15 डिसेंबरनंतर सुरु केल्या जाऊ शकतील अशी चर्चा आहे. दिल्लीत सध्या प्रदूषणाचा स्तर सर्वात धोकादायक पातळीच्याही वर पोहचल्याने तसा आदेश दिल्ली सरकारला देण्यात आला होता.