एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत 89 लाख 79 हजार रुपयांचा लाभ
प्रतिनिधी / रत्नागिरी
शासनाने सुरू केलेले प्रधानमंत्री मातृत्व वंदना अभियान ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांच्या आरोग्याला संरक्षक कवच देणारे ठरले आहे. या योजनेतून एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत जिल्हय़ातील 2 हजार 201 मातांना 89 लाख 79 हजार रुपयांचा लाभ देण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. कमलापूरकर यांनी सांगितले.
केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना’ योजना 1 जानेवारी 2017 पासून सुरू केली आहे. माता व बालकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे, माता-बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, कुपोषणाच्या समस्येला यशस्वीपणे समोर जाता यावे, या उद्देशाने योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. गर्भवती व स्तनदा मातांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा केल्यास नवजात बालकाचे आरोग्यही सुधारते. ही बाब ओळखून बुडणाऱया मजुरीची किंवा रोजगाराची चिंता गर्भवती स्त्रीला पडू नये, हा या योजनेमागचा उद्देश आहे.
या योजनेत गर्भवती महिला-स्तनदा माता यांना 5 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ही योजना सर्व स्त्राrयांसाठी लागू आहे. योजनेचा लाभ पहिल्या अपत्यासाठीच आहे. नोकरादार महिलांना लाभ देय नसला तरी अंगणवाडीसेविका, मदतनीस, आशा यांनाही या योजनेचा लाभ देय आहे. लाभार्थी स्त्रीच्या खात्यात 5 हजाराची रक्कम 3 टप्प्यात थेट जमा करण्यात येते.
जिल्ह्य़ात लॉकडाऊन काळातही एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीत 2201 मातांना 89 लाख 79 हजार रुपयांचा लाभ पहिल्या खेपेच्या गरोदर व स्तनदा मातांना देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात आजपर्यंत एकूण 20 हजार 458 मातांची नोंदणी झाली आहे. त्यांच्या खात्यात 8 कोटी 16 लाख 16 हजारांची रक्कम जमा करण्यात आली आहे. जिल्हाभरात 1276 आशा स्वयंसेविका व आरोग्यसेवक, सेविकांमार्फत या योजनेचा प्रसार करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या शासकीय आरोग्य संस्था तसेच आरोग्यसेवक, सेविका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी कमलापूरकर यांनी केले आहे.
पहिल्या खेपेच्या गरोदर मातांची नोंदणी व प्रसुती खासगी रुग्णालयात असली तरीही या योजनेचा लाभ देता येतो. त्यासाठी पहिल्या खेपेच्या मातांनी पहिल्या 12 आठवडय़ाच्या आत नोंदणी करणे, सर्व तपासण्या पूर्ण करणे तसेच लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड व लाभार्थीचे राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक व माता बालक संरक्षक कार्डाची, बाळाच्या जन्मदाखल्याची छायांकित प्रतही देणे आवश्यक आहे.