ऑनलाईन टीम / पुणे :
‘प्रबोधनकारांचा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक आहे. त्यांनी दिलेल्या स्वाभिमानावरच महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे. ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य केले असल्याचे मत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
बालगंधर्व रंगमंदीर येथे प्रबोधन शताब्दी सोहळयाचा समारोप उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विधान परिषदेच्या सभापती निलम गो-हे, खा. गिरीष बापट, आ. संजय शिंदे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संवाद संस्थेचे सुनिल महाजन,हरिष केंची, किरण साळी, सचिन विटकर उपस्थित होते.
‘संवाद-पुणे’ संस्थेने आयोजित केलेल्या, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या संपादकात्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाचा शतकोत्सव सोहळयासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने ‘प्रबोधन’ च्या शतकमहोत्सवी वाटचाल, त्यांची पत्रकारिता अभिनंदनीय आहे. प्रबोधनकार प्रभावी वक्ते, व्यंगचित्रकार, छायाचित्रकार, साहित्यिक, तैलचित्रकार बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्यासाठी त्यांनी ‘प्रबोधन’ पाक्षिक सुरू केले. नियतकालिक सुरु करुन चालवणे मोठे कठीण असणाऱ्या काळात त्यांनी ते धाडस केले आणि यशस्वी करुन दाखविले. ‘प्रबोधन’ पाक्षिकाने महाराष्ट्राला वैचारिक समृद्धी दिली, नव्या विचाराची पिढी घडविण्यात सिंहाचा वाटा उचलला. ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या माध्यमातून वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे कार्य केल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.