प्रतिनिधी/ रत्नागिरी
राजापुरात होऊ घातलेल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासंदर्भातील रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्हय़ात नव्याने सुरू असलेल्या घडामोडींसदर्भात पत्रकारांनी राजापूर भेटीत खासदार प्रभू यांना छेडले असता त्यांनी जोडीलाच इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी झालीच पाहिजे असे सांगीतले. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी झालीच नाही तर आपण खाणार काय? असा प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी केला. यासाठी ग्रामीण भागातील जनतेला अपेक्षित असलेला विकास आपण केलाच पाहिजे असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.
लोकांना जे हवे ते आपण दिले पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. आपण पर्यावरणमंत्री असताना सन 1998 मध्ये जनसुनावणीची तरतुद केलेली होती. जनसुनावणीतून बहुसंख्य लोकांची एखाद्या प्रकल्पाबाबत भावना लक्षात येते, असे मत माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार सूरेश प्रभू यांनी राजापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत जनमताचा अंदाज घेण्यासाठी यापूर्वी घेण्यात आलेल्या जनसुनावणीच्या प्रयत्नांना प्रकल्प विरोधकांनी खीळ घातलेली असताना आता पुन्हा नव्याने जनसुनावणीचा प्रयत्न राज्य शासन करणार का? असा प्रश्न खासदार प्रभू यांच्या वक्तव्यातून पुढे आला आहे.