प्रवाशांना आरटीपीसीआर बंधनकारक
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ामध्ये प्रवेश करणाऱया इतर राज्यातील प्रवाशांची तपासणी करण्यासाठी 23 चेकपोस्ट करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी आरटीपीसीआर झालेली कागदपत्रे तपासली जात आहेत. दोन डोस आणि आरटीपीसीआर झालेल्यांनाच राज्यात प्रवेश दिला जात आहे. त्या ठिकाणीदेखील तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे दिसताच त्यांना माघारी पाठविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातून येणाऱया 12 जणांना माघारी पाठविण्यात आले. यापुढेही अशी तपासणी सुरूच ठेवली जाणार आहे. कोगनोळी, कागवाड या चेकपोस्टजवळ अधिक सतर्कता बाळगण्यात आली आहे. मी स्वतः काही ठिकाणी भेटी देऊन सूचना केली आहे. तिसरा डोस देण्याबाबत प्रथम आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलीस व 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. मात्र दोन डोस घेऊन 9 महिने उलटले पाहिजे. तेव्हाच त्यांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
15 ते 18 वयोगटातील जिल्हय़ातील 2 लाख 47 हजार विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 54 हजार विद्यार्थ्यांना लस दिली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांना सक्त ताकीद करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे सरकारी योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे, अशीही सूचना खासगी रुग्णालयांना करण्यात आली आहे. एकूणच कोरोनाबाबत दक्षता घेण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी जनतेने आणि खासगी रुग्णालयांनीही सहकार्य करावे, असे आवाहनदेखील जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.