बससेवा पूर्ववत झाल्याने महसुलात वाढ : आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या परिवहनला दिलासा
प्रतिनिधी /बेळगाव
मागील आठवडय़ापासून सुरू झालेल्या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद हळूहळू वाढत आहे. विविध मार्गावर बस धावत असल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडलेल्या परिवहनला दिलासा मिळाला आहे.
संप आणि कोरोनामुळे साधारण दीड महिन्याहून अधिक काळासाठी बससेवा ठप्प झाली होती. त्यामुळे उत्पन्नही थांबले होते. परिणामी कर्मचाऱयांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान राज्य सरकारकडून परिवहनला मदत घ्यावी लागली. गतवषीदेखील परिवहनला कोरोनाचा प्रचंड प्रमाणात फटका बसला होता. त्यानंतर सुरू झालेल्या बससेवेला म्हणावा तसा प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या कोरोनाच्या लाटेतून सावरण्यापूर्वीच दुसऱया लाटेने परिवहन अडचणीत आले आहे. मात्र सध्या सर्व प्रकारच्या बस विविध मार्गांवर धावत असल्याने उत्पन्नात वाढ होईल, अशी आशा परिवहनला आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून सर्व प्रकारच्या बस विविध मार्गांवर धावत आहेत. शिवाय स्थानिक बसेससह लांब पल्ल्याची बससेवादेखील पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांची वर्दळदेखील वाढली आहे. शिवाय राज्यांतर्गत बससेवेबरोबरच आंतरराज्य बससेवा सुरू झाल्याने महसुलात वाढ झाली आहे. बसस्थानकातून स्थानिक बसेसबरोबर निपाणी, संकेश्वर, चिकोडी, अथणी, बैलहोंगल, सौंदत्ती, धारवाड, हुबळी आदी शहरांकडे बस धावत आहेत. तसेच वातानुकूलित बससेवाही सुरू झाल्याने लांब पल्ल्यासाठी रात्रीचा प्रवास करणाऱया प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
महसूल 25 ते 30 लाखापर्यंत
कोरोनाकाळात बससेवा ठप्प झाल्याने परिवहनचा महसूल शून्यावर आला होता. मात्र आता गेल्या आठ-दहा दिवसांपासून बससेवा पूर्ववत सुरू झाल्याने महसूल 25 ते 30 लाखापर्यंत होत आहे. पण यापूर्वी हेच उत्पन्न दररोज 70 ते 80 लाख रुपये होते.