प्रतिनिधी/ बेळगाव
स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि वेगवेगळय़ा ठिकाणी अडकलेल्या सर्व व्यक्तींसाठी राज्य सरकारच्या विनंतीनुसार काही विशेष गाडय़ा चालविल्या जात आहेत. इतर सर्व प्रवासी रेल्वे बंद ठेवण्यात आल्या आहेत. परंतु काही प्रवासी मात्र रेल्वे सुरू झाली या अफवेमुळे रेल्वे स्थानकांवर गर्दी करत असल्याने त्यांनी स्थानकांवर गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
प्रत्येक राज्यामध्ये मजूर व कामगार अडकले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या मूळ गावी परतायचे आहे. यासाठी मिळेल त्या पर्यायांची चाचपणी हे नागरिक करीत आहेत. काही दिवसांपूर्वी रेल्वेने श्रमिक रेल्वे सुरू करून कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडले. राज्य सरकारांनी मागणी केल्यानंतरच रेल्वे विभागाकडून ही सेवा दिली जात आहे.
परंतु काही अफवांमुळे नागरिक रेल्वे स्थानकांच्या परिसरात येऊन थांबत आहेत. रेल्वेची तिकिटे मिळतील का? अशी विचारणा केली जात आहे. त्यामुळे रेल्वेने एका परिपत्रकाद्वारे नागरिकांनी रेल्वे स्थानकांवर येऊन गर्दी करू नये, अशी सूचना केली आहे. बेळगाव रेल्वे स्थानकावरही कोणत्याही प्रवाशाला आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर न येण्याचा सल्ला कर्मचारी देत आहेत.