प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनासारख्या महाभयंकर रोगामुळे अनेक जण घरीच बसून होते. याला बेळगाव शहरही अपवाद नाही. मात्र, आता चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊननंतर काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आली होती. त्यामुळे बस प्रवासाला मुभा देण्यात आली होती. मात्र, अजूनही म्हणावे तसे नागरिक बसने प्रवास करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे बसस्थानकावर अजूनही शुकशुकाट पसरला आहे.
बेळगाव रेल्वे बसस्थानकावरून ग्रामीण भागाबरोबर मुख्यत: गोव्याला जाणाऱया बस अधिक आहेत. मात्र, परराज्यांतून येणाऱया बसेसना बंदी असल्यामुळे या ठिकाणी गर्दी कमी दिसून येत आहे. याचबरोबर ग्रामीण भागातून येणारे प्रवासीही कमी दिसू लागले आहेत. त्यामुळे हे स्थानक ओस पडल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने गेल्या आठवडय़ापासून राज्यांतर्गत मार्गांवर बस वाहतूक सुरू आहे. मात्र, प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने बसेस रस्त्यांवर, प्रवासी घरात अशी स्थिती पाहायला मिळत आहे. अशीच परिस्थिती आता रेल्वे बसस्थानकावरही दिसून येत आहे.
मागील दोन महिन्यांपासून बससेवा ठप्प असल्याने परिवहनला मोठा फटका बसत आहे. त्यात अजूनही काही प्रमाणात बससेवा सुरळीत सुरू नसल्याने याचा फटका परिवहन महामंडळाला अजूनही सहन करावा लागत आहे. राज्यांतर्गत बस सेवा सुरू झाल्या तरी प्रवाशांकडून मिळणारा थंडा प्रतिसाद हा आश्चर्यकारक आहे. परिवहन महामंडळाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावर मंगळवारी शुकशुकाट पसरला होता. एक किंवा दोनच प्रवासी थांबून होते. त्यामुळे ही भयावह परिस्थिती कधी संपणार, याकडेच लक्ष लागून राहिले आहे.
कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने तब्बल दोन महिन्यांनी काही ठिकाणी बसेस धावल्या. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करूनच त्यांना बसस्थानकात प्रवेश दिला जात आहे. रेल्वे बसस्थानकावर अशीच परिस्थिती आहे. कोणी प्रवासी देता का प्रवासी असे म्हणण्याची वेळ निर्माण झाली आहे. याचबरोबर शिथिलता आल्याने या परिसरातील दुकाने सुरू आहेत. मात्र, ग्राहक नसल्याने त्यांचीही परिस्थिती हलाखीची असल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात प्रवाशांकडून खरेदी-विक्री होत असते. मात्र, आता प्रवाशीच नसल्याने आपल्यावरही उपासमारीची वेळ आल्याचे येथील व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे रेल्वे बसस्थानकावरील शुकशुकाट कधी संपणार, अशी आशा साऱयांनाच लागून राहिली आहे.