नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांवरील निर्बंध 30 सप्टेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी विमानांवरील गेल्या 17 महिन्यांपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून ती 30 सप्टेंबरपर्यंत कायम करण्यात आली आहे. हे निर्बंध 30 सप्टेंबरच्या मध्यरात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत कायम राहतील. दरम्यान, मालवाहू (कार्गो) विमानांचे प्रचलन कोणत्याही बंधनांविना सुरू राहील. शिवाय, निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवर नियोजित फेऱया मर्यादित स्वरूपात चालविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असताना गेल्या पाच-सहा दिवसात सातत्याने नव्या बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. देशात पुन्हा रुग्णवाढ सुरू झाल्याने तिसऱया लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच निर्बंध वाढविण्याचा निर्णय ‘डीजीसीए’ने घेतला आहे. ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरु होणार की नाही हे मात्र तेव्हाच्या परिस्थितीवरून ठरविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.