वार्ताहर/ परळी
सातारा तालुक्यातील नित्रळसारख्या ग्रामीण भागातून भाईंनी संपूर्ण महाराष्ट्रात आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे माझ्यासह अनेक राजकीय सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळींच्या यशस्वीतेमध्ये भाईंचा हा सिंहाचा वाटा आहे. भाईंच्या या कार्याला माझा सलामच आहे, असे गौरवोद्गार विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नित्रळ येथील श्री केदारनाथ पंच धाम देवालयाच्या लोकार्पण सोहळ्या दरम्यान काढले. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भैय्या भोसले, तहसीलदार आशा होळकर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रवीण दरेकर पुढे म्हणाले, नित्रळसारख्या ग्रामीण भागामध्ये अनेक अडचणी असतात. मात्र भाई वांगडे हे एक ऊर्जित प्रेरणास्थान आहे ज्यांनी संपूर्ण समस्यांवर मात करत एक पंचक्रोशीला साजेशी अशी वास्तू, एक पंचधाम देवालय उभे केले आहे ते नक्कीच भागाला आदर्शवत राहील. हा परिसर निसर्गसंपन्न आहे. बाजूला उरमोडी जलाशय आणि डोंगर कपारीतील ही वास्तू मनमोहक दिसत आहे. केदारनाथ पंचधाम देवालय परिसरात उभारण्यात आलेली गोशाळा, अन्नपुर्णा सदन यांसारखे विविध उपक्रम खरच वाखाणण्याजोगे आहेत. येथे आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते याचे श्रेय पूर्णपणे भाई तसेच नित्रळ ग्रामस्थांचे आहे. भाईंनी कधीच कोणत्याही पदाची केव्हा कशाचीच इच्छा किंवा अपेक्षा न ठेवता स्वतःला समाजकार्यामध्ये झोकून दिले आहे. माझ्या कारकिर्दीत ही भाईंच्या सिंहाचा वाटा आहे कोणतेही कार्य करायचं असेल तर भाईंचा शब्द हा आमच्यासाठी अंतिम असतो. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितल्याप्रमाणे उरमोडी जलाशयाच्या विळख्यात सापडलेल्या पाच गावांचा निधी हा बंद करण्यात आलेला आहे येत्या विधानसभेत तो प्रश्न मार्गी लावण्याचा मी नक्की प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, नित्रळमध्ये भाईंच्या संकल्पनेतून तसेच त्यांच्या परिश्रमातून ग्रामस्थांच्या सहकार्यातून हे देवालय उभ राहिले आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून याचे बांधकाम सुरू होतं तेव्हा नकळतच सर्वांच्या मनामध्ये शंका आली असेल कि हा मांडलेला मंदिराचा पसारा नक्की पूर्णत्वास येईल का? मात्र भाईंनी आपली जिद्द सोडली नाही त्यामुळे आपल्यासमोर एक आदर्श वास्तू उभी राहिली आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांसह इतर पंचक्रोशीतील लोकांनाही संस्कारपीठं भाईंनी निर्माण केले आहे. शिवसह्याद्री पतसंस्थेच्या माध्यमातून केलेला जनसमुदाय तसेच त्यांचे असलेले शैक्षणिक क्षेत्रातील काम असो वा कला क्षेत्र किंवा वारकरी क्षेत्रातील काम असो यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन सर्वसामान्य माणसांसाठी या देवालयाच्या माध्यमातून एक संस्कारपीठ संस्थान निर्माण केले आहे, याचा सार्थ अभिमान आहे.
राजू भोसले म्हणाले, आमच्या परळी भागातील भाईंसारखे आदर्श व्यक्तिमत्व आमच्या सदैव पाठीशी आहे. तसेच भागातील कोणत्याही अडीअडचणी आल्या तरी भाईंची साथ ही भक्कम आमच्या पाठीशी आहे. भाईंच्या मार्गदर्शनातून निर्माण झालेल्या या वास्तूला दरेकर साहेब तुमच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळेस करतो असेच उद्गार राजु भोसले (भैय्या) यांनी यावेळी काढले. सूत्रसंचालन किरण वांगडे यांनी केले.
भाईंची साथ असेल तर एक रिक्षा ड्रायव्हर जिल्हा बँकेचा संचालक होऊ शकतो – शिवेंद्रसिंहराजे भोसले
एका सर्वसामान्य कुटुंबातून म्हणजेच अगदी रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करणारे ज्ञानदेव रांजणे शिवसह्याद्री परिवाराचे शाखा प्रमुख म्हणून काम केले. एका चांगल्या व्यक्तीच्या सानिध्यात असले की आपण नेहमी प्रगतीपथावर असू म्हणून रांजणे साहेब आज सातारा जिल्हा बँकेच्या संचालकपदी कार्यरत आहेत. भाईंनी कधीही स्वतःसाठी कधीही अपेक्षा धरली नाही त्यांनी फक्त समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून घेतले आहे, असे व्यक्तिमत्त्वाचे आम्हालाही मार्गदर्शन मिळते आणि तुम्हालाही मिळत आहे हे आपले भाग्यच आहे.