कोकणाला आवश्यक मदत देण्याची पवार यांची ग्वाही
नवी दिल्ली/ प्रतिनिधी-
देशाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज नवी दिल्ली येथे त्यांचे निवासस्थानी 6 जनपथ रोड, नवी दिल्ली येथे भेट घेतली व त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि भूस्खलन यामुळे जनतेचे झालेले नुकसान याविषयी माहिती दिली. पवार यांनी सदर परिस्थितीचा 2 दिवसापूर्वीच संपूर्ण आढावा घेतला असून, सदर ओढवलेल्या परिस्थिती विषयी महाराष्ट्र सरकार गंभीर आहे आणि पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे नमूद केले.
आपत्तीग्रस्तांच्या आस्थापनांच्या तसेच घरांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून, आर्थिक मदत आपत्तीग्रस्तांपर्यंत लवकरात लवकर पोचेल अशी ग्वाही या भेटीवेळी पवार यांनी बोलताना जनतेस दिली. सरकारी मदत आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहचेस्तोवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 20,000 आपत्तीग्रस्तांना धान्य, भांडी, सतरंजी आणि चादरी अशा अत्यावश्यक वस्तूंचा व इतर सोयीचा पुरवठा लवकरच करण्यात येईल असे सांगितले.
ही मदत प्रथमतः रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अतिभावित क्षेत्रात करण्यात येईल असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्राच्या जनतेवर ओढवलेल्या परिस्थितीत राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व कार्यकत्यानी आपापल्या परीने पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन साहेबांनी सूचित केले.
या भेटीवेळी प्रवीण भोंसले यांच्या सोबत त्यांचे पुतणे, सर्वोच्च न्यायालयाचे वकील संग्रामसिंह भोंसले तसेच आशिष शिरोडकरसुद्धा उपस्थित होते.